साधनाचे पूर्वीचे सर्व संपादक 'लार्जर देंन लाइफ' अशी प्रतिमा असणारे होते. त्यांचा काळ वेगळा, ती परिस्थिती वेगळी. ते सर्व जण वाचकांचे आणि समाजनेत्यांचेही मार्गदर्शक म्हणता येतील असे होते. मी मात्र वाचकांचा आणि समाजनेत्यांचा एक जाणकार व बहुश्रुत मित्र अशा पद्धतीने वावरलो आहे. सर्व बाजूंनी सहानुभूतिपूर्वक विचार करणे, असा विचार इतरांनाही करावयास लावणे आणि त्यातून काही एक निश्चित व निर्णयात्मक भूमिकेपर्यंत जाणे हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा राहिला आहे. साहजिकच, सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन राहिला आणि प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध भूमिका घेण्याचा प्रयत्न मी यथाशक्ती केला. त्यातील यश-अपयश संमिश्र आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अभय बंग, प्रमुख पाहुणे गिरीश कुबेर, पुरस्कारांचे प्रवर्तक गिरीश गांधी, विचारपीठावरील अन्य मान्यवर आणि उपस्थित मित्रहो...!
गिरीश गांधींची आणि माझी ओळख मागील पंधरा वर्षांपासूनची आहे; पण या संपूर्ण काळात आम्ही भेटलो, चार किंवा पाच वेळा आणि फोन झाले असतील पाच-सात वेळा. मात्र, ते 'साधना' नियमितपणे वाचतात आणि त्यांचे साधनाशी असलेले नाते मागील अर्धशतकाचे आहे. साहजिकच, ते मला आणि साधनाला जास्त ओळखत असावेत. त्यामुळे, प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'मारवाडी फाउंडेशन'चा प्रबोधन पुरस्कार मला देण्याचा निर्णय त्यांनी फोनवर ऐकवला, तेव्हा मी म्हणालो, "माझे स्वतःचे असे काहीएक कार्यकर्तृत्व निश्चित आहे. पण आतापर्यंत तुम्ही हा पुरस्कार भा.ल. भोळे, पन्नालाल सुराणा, शरद जोशी, आ. ह. साळुंखे, मा. म. गडकरी, एन.डी. पाटील, बाबा आढाव, सदानंद मोरे, गिरीश कुबेर, मिलिंद बोकील इत्यादी मान्यवरांना दिला आहे. त्या मांदियाळीत मी बसत नाही. ही सर्व माणसे केवळ वयाने आणि अनुभवाने मोठी होती असे नाही; तर त्यांचे कार्यक्षेत्र आणि प्रभावक्षेत्र कितीतरी मोठे आहे. त्यामुळे, मी हा पुरस्कार घेऊ शकत नाही."
माझे ते सांगणे हा केवळ नम्रतेचा भाग नव्हता. त्यामागे काहीएक विचार होता. म्हणून मी त्यांना पुढे म्हणालो, "महाराष्ट्र फाउंडेशनच्या साहित्य आणि समाजकार्य पुरस्कारांचा मी दहा वर्षे मुख्य समन्वयक होतो, त्या काळात शंभरांहून अधिक पुरस्कार देण्याच्या प्रक्रियेत मध्यवर्ती होतो. निवड समितीच्या कामात हस्तक्षेप करत नव्हतो, पण एक आग्रह सातत्याने धरत होतो. तो म्हणजे, पुरस्कारांचे निकष काय आहेत आणि यापूर्वी हे पुरस्कार कोणाला दिलेत, हा विचार अंतिम निवड करताना मध्यवर्ती ठेवा. त्यामुळे, पुरस्कार देण्याच्या आणि घेण्याच्या बाबतीत माझ्यात मूळचीच असलेली अलिप्तता किंवा तटस्थता बरीच वाढलेली आहे."
तर माझे ते म्हणणे ऐकूनही गिरीशभाऊंनी आग्रह धरला, तेव्हा म्हणालो, "हा पुरस्कार मला द्यायचाच असेल तर अजून पाच-सात वर्षे तरी थांबा." त्यावर ते शांतपणे म्हणाले, "मी एका मोठ्या आजारातून नुकताच उठलो आहे. पाच महिन्यांनंतर कार्यालयात आजच आलो आहे. आणि तुला फोन केला आहे. तुझ्या हाताशी वेळ आहे, पण माझ्या हाताशी नाही." त्यावर मी शांत झालो. कारण, कितीही बुद्धिवादी असलो तरी प्रामाणिक भावनांचे महत्त्व जाणतो.
मी होकार दिला, पण पुढील चार आठ दिवस अस्वस्थ होतो. नंतर मी स्वतःची समजूत घातली. ती कशी? 'हा प्रबोधन पुरस्कार मला दिला जातोय. कारण मी प्रबोधनाचे काम मागील दीड-दोन दशके करीत आलोय, ते केवळ 'साधना'च्या माध्यमातून. साप्ताहिक, प्रकाशन आणि त्यांना जोडणारे अनेक कार्यक्रम उपक्रम यांद्वारे. अर्थातच, हे काम करण्यात माझ्यासोबत अनेक घटक आहेत. पूर्वीचे आणि आताचे सहकारी आहेत, अनेक लेखक, वाचक, हितचिंतक आहेत. साधना ट्रस्टचे आजी माजी विश्वस्त आहेत, सल्लागार आहेत. त्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून आपण हा पुरस्कार स्वीकारतोय...!' आणि मग माझा संकोच थोडा कमी झाला.
पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा साधनातील सहकारी, कुटुंबीय, नातलग, वाचक, लेखक आणि हितचिंतक यांना विशेष आनंद झाल्याचा अनुभव मी घेतला. त्यातही विशेष हे की, 'हा पुरस्कार आपल्यालाच मिळालाय' असे वाटणाऱ्यांची संख्या, मी समजत होतो त्यापेक्षा बरीच जास्त निघाली. त्या सर्वांच्या वतीने गिरीशभाऊंचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे आणि मारवाडी फाउंडेशनचे आभार मानतो! प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो...
पुरस्कार प्रदान समारंभ नोव्हेंबरच्या अखेरीस करायचा हे गिरीशभाऊंनी मला सप्टेंबरच्या सुरुवातीला सांगितले होते. म्हणजे पुरेसा अवकाश होता. मी होकार दिल्यावर, 'पाहुणे कोण असावेत' असे त्यांनी मला विचारले होते. तेव्हा मी म्हणालो होतो की, पत्रकारितेच्या किंवा समाजकार्याच्या क्षेत्रातील व्यक्ती असाव्यात. नंतरच्या दोन महिन्यांत आमचा फोन झालाच नाही. पण पुरस्कार प्रदान कार्यक्रमासाठी माझ्या मनात दोन नावे होती. गिरीशभाऊंनी मला विचारले असते तर सांगणार होतो, 'त्या दोनपैकी कोणाही एकाला बोलवा.' पण त्यांनी मला त्याबाबत विचारले नाही. त्यांनी कार्यक्रम ठरवला तेव्हा लक्षात आलं की, माझ्या मनातील त्या दोघांनाही बोलावले आहे. एकाला प्रमुख पाहुणे म्हणून, तर दुसऱ्याला अध्यक्ष. म्हणजे मला आणि साधनाला गिरीशभाऊ किती जास्त ओळखतात त्याचा आणखी एक पुरावा.. हीच दोन नावे सुचवण्याचे कारण आजच्या महाराष्ट्रावर असलेला त्यांचा प्रभाव. एकाचा पत्रकारितेच्या क्षेत्रातला आणि दुसऱ्याचा समाजकार्याच्या क्षेत्रातला. ही दोन नावे माझ्या मनात का आली? हे दोघेही साधनाकडे सहानुभूतीने आणि तरीही तटस्थतेने पाहू शकतात म्हणून. आणि याच दोन क्षेत्रांतले का? तर पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते आणि चळवळी आंदोलने करणाऱ्या समाजकार्याला मी पाचवा स्तंभ संबोधत आलोय. आणि माझी अशी धारणा आहे की, चौथ्या व पाचव्या स्तंभांची युती आवश्यक आहे, उर्वरित तीन स्तंभांवर वचक ठेवण्यासाठी..
आता मूळ विषयाकडे वळतो, प्रबोधनाकडे..
साधना साप्ताहिकाची सुरुवात भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापन दिनाला झाली. मानवी संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ता म्हणता येईल अशा साने गुरुजींनी ते सुरू केले. मागील पाऊण शतक ते अखंड प्रकाशित होते आहे. राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील लेखन साधनेतून प्रसिद्ध केले जाते. प्रामुख्याने विश्लेषणात्मक आणि चिकित्सक. वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक अशी साधनाची ओळख राहिली आहे. ती निर्माण करण्यात आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, नानासाहेब गोरे, वसंत बापट, ग. प्र. प्रधान, डॉ. नरेंद्र दाभोलकर या संपादकांचे आणि त्यांना साथ देणाऱ्या अनेकांचे योगदान आहे.
अशा या साधना साप्ताहिकात मी मागील 18 वर्षे पूर्ण वेळ काम करतोय. युवा संपादक व कार्यकारी संपादक या नात्याने सहा वर्षे आणि संपादक या नात्याने 12 वर्षे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची ओळख अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते अशी आहे. परंतु अखेरची पंधरा वर्षे ते साधनाचे संपादकही होते. त्यांच्याबरोबर मी स्तंभलेखक ते कार्यकारी संपादक या नात्याने नऊ वर्षे होतो. आमची पहिली भेट 5 जानेवारी 2004 रोजी झाली. माझा पहिला लेख 'विजय तेंडुलकर यांना एका तरुणाचे अनावृत पत्र', त्याच आठवड्यात साधना साप्ताहिकाची 'कव्हर स्टोरी' म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्या पहिल्याच भेटीत त्यांनी मला तीन वाक्ये ऐकवली होती. 'तुझ्या वाचनाची खोली व व्याप्ती या लेखातून दिसते. किती सभ्य भाषेत परखड टीका करता येते याचे उदाहरण म्हणून हा लेख दाखवता येईल. आणि तुझ्या विचारांची दिशा योग्य आहे.' यातील तिसरे वाक्य मला तेव्हाही मोठे प्रशस्तिपत्र वाटले होते, आजही वाटते. याचे कारण रॅशनल थॉट आणि रॅशनल ॲक्शन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारकार्याचा गाभा होता. त्यांच्याकडून मिळालेले ते प्रशस्तिपत्र होते.
साधनाला स्वतःचा असा ध्येयवाद होता आणि आहे. प्रत्येक संपादकाच्या काळात काही बदल झाले; परंतु मूळचा गाभा कायम राहिला. काय आहे तो गाभा ? समाजप्रबोधन. कोणत्या प्रकारचे समाजप्रबोधन ? त्या संदर्भात एक अभिप्राय विशेष महत्त्वाचा आहे.
1973 मध्ये साधनाचे 25 वे वर्ष आले तेव्हा, 'मनोहर' साप्ताहिकात, त्या साप्ताहिकाचे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांनी एक परिच्छेद लिहिला होता. तो इथे वाचून दाखवतो. (तेव्हा 'मनोहर' हे तरुणाईमध्ये प्रिय असलेले साप्ताहिक होते, त्याचा खप 50 हजार प्रतींपेक्षा जास्त होता आणि त्या वेळी साधनाचा खप 3 हजार प्रतींपेक्षा कमी होता.) तर मुकुंदरावांचा अभिप्राय असा होता...
"साधना साप्ताहिकाने आपली 25 वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. या रौप्य महोत्सवी वाटचालीबद्दल आम्ही साधनाकारांचे अभिनंदन करतो. आतापर्यंतच्या वाटचालीत साधनाने थोडीबहुत वळणे घेतली आहेत. पण प्रामुख्याने तिची दिशा समाजप्रबोधनाचीच राहिली आहे. समाजप्रबोधनाची म्हणण्यापेक्षादेखील समाजनेत्यांच्या प्रबोधनाची, असे म्हणणे बरोबर ठरेल. हे कार्य खडतर असते. त्याचे यशापयश सर्क्युलेशनवर मापणे हे साधनावर अन्याय करणारे ठरेल. तो अन्याय आम्ही कदापि करणार नाही. विजेच्या क्षेत्रात जे कार्य जनित्राचे असते, ते कार्य वृत्तपत्र व्यवसायात साधनाचे आहे, असे आम्ही मानतो. तेथून जेवढी वैचारिक वीज निर्माण होईल, तेवढा सप्लाइंग स्टेशन्समार्फत घरोघर प्रकाश उजळणार आहे. त्याची आज फार आवश्यकता आहे. साधनाचे विचारजनित्र अधिकाधिक वेगाने फिरावे; त्याने समाजातील विषमता, खळबळ, अन्याय यांना ज्वलंत भाषेत बिनदिक्कत वाचा फोडावी. आणि त्यातून साधनाला अभिप्रेत असा नव्या रचनेचा मार्ग दाखवावा, अशी आमची मनापासून इच्छा आहे. आम्ही साधनाला सुयश चिंतितो."
...मुकुंदराव किर्लोस्कर, साप्ताहिक मनोहर, 26 ऑगस्ट 1973
पंचविसाव्या वर्षापर्यंतच्या साधनासाठी मुकुंदरावांनी दिलेला हा अभिप्राय त्यानंतरच्या आणि आजच्या साधनालाही लागू होईल का? माझा तसा दावा नाही.
मात्र, माझ्यासमोरचा ध्येयवाद तोच आहे, त्याच दिशेने जाण्याचा प्रयत्न मी करत आलोय. अर्थातच, अनेक लहानथोरांच्या साहाय्याने.
साधनाचे पूर्वीचे सर्व संपादक 'लार्जर देंन लाइफ' अशी प्रतिमा असणारे होते. त्यांचा काळ वेगळा, ती परिस्थिती वेगळी. तेव्हाची आव्हाने वेगळी आणि संधीही वेगळ्या. आणि अर्थातच कर्तबगारीही वेगळी. ते सर्व जण वाचकांचे आणि समाजनेत्यांचेही मार्गदर्शक म्हणता येतील असे होते. मी मात्र वाचकांचा आणि समाजनेत्यांचा एक जाणकार व बहुश्रुत मित्र अशा पद्धतीने वावरलो आहे. सर्व बाजूंनी सहानुभूतिपूर्वक विचार करणे, असा विचार इतरांनाही करावयास लावणे आणि त्यातून काही एक निश्चित व निर्णयात्मक भूमिकेपर्यंत जाणे हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा राहिला आहे. साहजिकच, सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन राहिला आणि प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध भूमिका घेण्याचा प्रयत्न मी यथाशक्ती केला. त्यातील यश-अपयश संमिश्र आहे.
विविध घटना-घडामोडींच्या निमित्ताने विविध विषयांवर स्वतः लेखन करताना, इतरांकडून लिहून घेताना, चालत आलेले लेखन निवडताना पुरोगामित्व ही पूर्वअट राहिली आहे. जात, धर्म, भाषा, प्रांत, लिंग या पाच घटकांच्या बाबतीत अधिकाधिक उदारमतवादी भूमिका असणे आणि त्या पाच घटकांच्या बाबतीत संकुचितपणाला ठोस विरोध करणे, याला मी पुरोगामित्व संबोधत आलोय. त्या संदर्भात विचलित होण्याचा प्रसंग एकदाही आला नाही. मात्र, विशिष्ट विषयावर भूमिका घेताना विविध विचारप्रवाहांशी आणि विविध समाजघटकांशी सामना करावा लागतो. त्यांचे राग-लोभ स्वीकारावे लागतात. त्यामध्ये वैचारिक विरोधक तर असतातच, पण समविचारी लोकही असतात. तशी अनेक उदाहरणे देता येतील. पण इथे पाच प्रमुख उदाहरणे (माझ्या काळातील ) देतो.
1. या देशात आर्थिक उदारीकरण हा गेल्या तीन दशकांतील कळीचा मुद्दा राहिला आहे. त्या संदर्भात एका बाजूला ठोकळेबाज विरोध आणि दुसऱ्या बाजूला प्रच्छन्न समर्थन दिसते. वस्तुस्थिती आणि समाजहित या दोहोंच्या मध्ये असते. त्यामुळे, आर्थिक सुधारणा आणि कल्याणकारी योजना परस्परविरोधी नाहीत, ही भूमिका साधनेतून मी कमी-अधिक तीव्रतेने मांडत आलो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी कमी-अधिक टीका आणि कमी-अधिक कौतुक वाट्याला आले.
2. भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला सर्वांत मोठे आव्हान नक्षलवादाचे आहे, हे विधान पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले होते. त्या दशकभरात साधनाने नक्षलवादाच्या विरोधात सुस्पष्ट व ठोस भूमिका सातत्याने लावून धरली. 'नक्षलवाद्यांचे मार्ग चुकीचे, पण त्यांचे ध्येय बरोबर', असे मानणारे लोक ओपिनिअन मेकर वर्गात सर्वत्र असतात. त्या संदर्भात 'नक्षलवाद्यांचे मार्ग तर चुकीचे आहेतच, पण त्यांचे ध्येयही चुकीचे आहे', अशी ठोस भूमिका आम्ही घेतली. तेव्हा काही घटकांची नाराजी पत्करली. आणि आता 'अर्बन नक्षल' या नावाखाली सरकार जे काही करू पाहते आहे, ते कमालीचे घातक आहे, हे ठासून सांगण्याची वेळ आली आहे.
3. आरक्षण हा विषय मागील दोन दशके धुमसता राहिला आहे. जातीवर आधारित आरक्षण आणि महिलांना आरक्षण विविध ठिकाणी आवश्यक आहे, तोच कमीतकमी सदोष मार्ग आहे; असे आम्ही ठोसपणे मांडत आलो. पण सर्व प्रकारच्या आरक्षणाचा विशिष्ट काळानंतर फेरआढावा घेत राहून, आरक्षण कमी-कमी करत जाण्याच्या दिशेने प्रवास करायला हवा, अशी भूमिकाही खूप स्पष्टपणे आणि सातत्याने मांडली आहे. अर्थात, त्या भूमिकेला फारसा विरोध कोणी केला नाही; पण त्या भूमिकेचे स्वागतही फारसे झाले नाही.
4. मुस्लीम समाजसुधारणांच्या संदर्भात हमीद दलवाईंचा मार्ग बरोबर आहे, अशी भूमिका आम्ही सातत्याने लावून धरली आहे. त्या भूमिकेमुळे हिंदुत्वादाला बळ मिळेल अशी भीती अनेक समविचारी हितचिंतकांनी दाखवली, पण त्या भीतीला न जुमानता मुस्लीम समाजसुधारणांचा सुस्पष्ट पुरस्कार केला. आणि त्याच वेळी विद्वेषी हिंदुत्ववादाला आणि अंध व आक्रमक राष्ट्रवादाला प्रखर विरोधही चालूच ठेवला आहे.
5. अण्णा हजारे, केजरीवाल, बाबा रामदेव यांची आंदोलने बारा-तेरा वर्षांपूर्वी देश ढवळून काढत होती. तेव्हा हा देश क्रांतीच्या मार्गावर नाही आणि हा दुसरा स्वातंत्र्यलढाही नाही, यातून या देशाची मोठीच पिछेहाट होणार आहे अशी भूमिका आम्ही घेतली. अर्थातच, चळवळी आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या साधनाने अशी भूमिका घेणे तेव्हा अनेक लहानथोरांना खटकले होते.
वर केवळ वानगीदाखल पाच उदाहरणे दिलीत. त्यांचा विस्तार मी इथे करत नाही. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अशा भूमिका घेताना कसोटी लागते, धैर्याची आणि विवेकाची.
गेल्या दोन दशकांपैकी आधीचे दशक केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. नंतरचे दशक भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. या दोन्ही काळांतील साधनाचे अंक व विशेषांक, त्यातील लेख व संपादकीय लेख पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल. त्यात, भाजप आणि तत्सम पक्ष-संघटनांच्यावर कठोर टीका आहे; परंतु काँग्रेस आणि तत्सम पक्ष संघटनांची भलामण पाहायला मिळणार नाही. कारण साधनाची बांधिलकी पुरोगामी उदारमतवादी विचारांशी आहे; कोणत्याही पक्ष-संघटनेशी नाही. या संपूर्ण काळात उदात्त ध्येयवादाला जोरदार समर्थन आणि अंध व आक्रमक राष्ट्रवादाला प्रखर विरोध केला आहे.
हे सर्व यथाशक्ती करताना, काय जमले नाही किंवा करायचे राहून गेले, याची यादी खूप मोठी आहे. मात्र, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण, उद्योग व्यापार आणि शेती या चारही क्षेत्रांतील गहन गंभीर लेखन सातत्याने प्रसिद्ध करण्यात आम्हाला पुरेसे यश आलेले नाही. त्याला मराठी लेखन जगताच्या मर्यादाही कारणीभूत आहेत; पण तरीही आम्ही कमी पडलो अशी माझ्या मनातील तीव्र भावना आहे.
आता साधना 80 च्या उंबरठ्यावर आहे. मागील पाच-सहा वर्षांत साधनाने डिजिटल क्षेत्रात खूप काम करून ठेवले आहे. पण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करताना सर्जनशीलता असावीच लागते आणि 'content is the king' याचे भान कधीही सुटलेले नाही. त्यामुळेच, पाच वर्षांपूर्वी साधना डिजिटल प्रकल्पासाठी ग्रँट द्यायला बंगलोर येथील इंडिपेंडेंट अँड पब्लिक स्पिरिटेड मीडिया फाउंडेशन स्वतःहून पुढे आले, तेव्हा मराठीत पहिली निवड त्यांनी साधनाची केली. आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, यूके यांनी अलीकडेच त्यांच्या Al Learning साठी डिजिटल कंटेंट विकत मागण्यासाठी मराठीत पहिली निवड साधनाची केली. आम्ही योग्य दिशेने जात आहोत, त्याचा हा एक वेगळा पुरावा आहे, असे मानायला हरकत नसावी.
गुणात्मक वाढ आणि संख्यात्मक वाढ एकाच वेळी होत असेल तरच 'विकास' ही संज्ञा वापरता येईल, अशी भूमिका आम्ही सातत्याने घेत आलो. हा देश एकसंध व एकात्म राहायचा असेल, आधुनिक व सामर्थ्यशाली व्हायचा असेल तर सर्व घटकांना समान संधी मिळायला हवी, कमजोर घटकांना झुकते माप देतच ते साध्य करता येईल, अशी धारणा कायम राहिली आहे. भारतीय संविधानाच्या मूल्यांशी ते सुसंगत आहे. त्यासाठी खऱ्या राष्ट्रवादाच्या दिशेने जायला हवे, असा माझा आग्रह आहे. आज उद्यासाठी आव्हाने अनेक आहेत; पण त्या तुलनेत संधी जास्त आहेत असेही मला वाटत आले आहे. त्या संधी साधण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात लहानमोठे समाजनेते असले पाहिजेत, त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रबोधन करण्याचे काम यथाशक्ती पार पाडले पाहिजे. त्यामुळे, गुणवत्ता आणि विश्वासार्हता यांच्यासह आलेली कार्यक्षमता मला नेहमीच खुणावत आली आहे. प्रलोभनापासून दूर राहता आले तर दडपणाला बळी पडण्याचे प्रसंग फारसे येत नाहीत आणि आले तरी ते झुगारून देण्याचे सामर्थ्य अंगामध्ये संचारलेले असते, असाच माझा अभ्यास आहे, अनुभव आहे. आणि विचारपूर्वक घेतलेल्या भूमिकेसाठी व केलेल्या कृत्यासाठी किंमत चुकवण्याची तयारी मनोमन असेल, तर प्रबोधनाच्या आघाडीवर लढता येणे सुंदर असते, आनंददायक असते. धन्यवाद !
नागपूर येथील मारवाडी फाउंडेशनच्या वतीने 2008 पासून, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समाजप्रबोधन पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांना जाहीर झाला होता. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपातील हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी, 27 नोव्हेंबर 2025 रोजी नागपूर येथील चिटणीस सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते आणि 'शोधग्राम'चे संस्थापक डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. त्या कार्यक्रमात केलेले भाषण आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या