आत्मकथा पहिल्या स्वातंत्र्यदिनापर्यंतच आहे. खरे तर 1947 ते 1995 हा महत्त्वाचा भाग राहिलाच. हे खरे की अनेक ग्रंथांमधून अगदी जनता प्रयोग, अयोध्या व हवालापर्यंत आले आहे. परंतु आत्मकथेतून याच बाबी विशेष रूप धारण करून आल्या असत्या यात शंका नाही. समाजवादी चळवळीचा इतिहास स्वतंत्रपणे लिहायचा ठरवूनही राहून गेला. आता हे काम कोण करणार? निदान प्रेम भसीन यांनी हे काम हाती घेतले तर काय बहार येईल!
मधू लिमये हा नामोच्चार होताच कोणाकोणाच्या मनात काय काय वादळे उठत असतील? कारण मधू लिमये हेच मुळी एक वादळ होते व ते अनेक वादळे उठवीत असे.
कोणी म्हणेल असा हा मराठी माणूस पार बिहारमधील मुंगेरमधून निवडून येत असे; तर कोणी म्हणेल पण महाराष्ट्रात उभे राहण्याची त्याची हिंमत नव्हती. कोणी म्हणेल इंदिरा गांधींच्या अधिकारवादाविरुद्ध पहिली तोफ डागली ती मधुजींनी; तर इंदिराभाट म्हणतील की 'इंदिरा इज इंडिया' हे त्यांना कळलेच नाही. पक्षांतर बंदी विधेयकाला अडविणारे म्हणून काहींनी टीका केली; तर त्या वेळी बरोबर उणीव दाखविली म्हणून काही जण स्तुती करतात. तहकुबीचा शस्त्रासम प्रभावी वापर करणारे संसदपटू म्हणून विरोधकांनी स्तुती केली, तर कामकाजातील अडथळा म्हणून सत्ताधाऱ्यांनी निंदा केली.
कांती देसाई प्रकरण लोकसभेत उपस्थित करताच निर्भीडपणाबद्दल अनेकांनी धन्यवाद दिले; तर चालत्या गाड्याला खीळ घालणारे म्हणून स्वकीयांनी दोष दिला. पक्षफोडे हे बिरुद तर सावलीसारखे पाठराखण करीत राहिले. परंतु याच मधुजींनी जनता पक्ष एकसंध व्हावा म्हणून काय काय जंग पछाडले होते याचा उल्लेख कटाक्षाने टाळला जातो. गोबेल्सच्या तंत्रानेच त्यांची विकृत प्रतिमा तयार करण्यात आली. अलीकडे संघपरिवाराचे अभद्र रूप स्पष्ट झाल्यावर मात्र अनेकजण दुहेरी सदस्यत्वाचा विचार वेगळ्या तऱ्हेने करू लागले आहेत. आता तर अनेक भाजपीयही हा प्रश्न उपस्थित करताना दिसतात.
मात्र मधू लिमये यांची समर्पण वृत्ती आणि बुद्धिमत्ता यांबद्दल सर्वत्र आदरभावच दिसून येतो. 'अधु मेंदूचा मधु' लिहिणारे आचार्य अत्रेही म्हणतील की दहा हजार वर्षांत असा निरर्थक विनोद कोणी केला नव्हता. जनता सरकारचे चालून आलेले मंत्रिपद त्यांनी नाकारले व पक्षपद पत्करले.
वयाच्या पंचविसाव्या वर्षी अँटबर्प येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मधु लिमयेनी चलेजाव चळवळीत, गोवा मुक्तिसंग्रामात आणि आणीबाणीत प्रदीर्घ कारावास अनुभवला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या धर्मातीत परंपरेबद्दल आणि त्यातून निर्माण झालेल्या संविधानाबद्दल त्यांना निरतिशय अभिमान होता. म्हणूनच बावरी मशिदीचा विध्वंस आणि हवाला प्रकरण यांमुळे ते अत्यंत क्रोधित व दुःखित झाले होते.
या थोर राजकीय चिंतकाने आपल्या धकाधकीच्या जीवनातही पंचवीस एक विचारगर्भ पुस्तके लिहिली. परंतु हा माणूस कसा आहे हे या वैचारिक लिखाणांतून पूर्णपणे कसे कळणार? निधनानंतरचे मृत्युलेख, प्रो. विनोदप्रसाद सिंह यांचे 'मधू लिमये : जीवन और राजनीती' तसेच दिल्लीत प्रसिद्ध झालेले 'मधुजी' यांतून व्यक्तित्वावर झोत पडतो. परंतु अंतरंगावर प्रकाश आत्मचरित्रातूनच पडणार.
गांधी, नेहरू, ट्रॉटस्की, रॉय, रसेल, कोस्लर इत्यादींच्या आत्मचरित्रांतून त्या थोर व्यक्तित्वांचा पुरेसा परिचय होतो. परंतु समाजवाद्यांनी, सुरेंद्रनाथ द्विवेदी व एसेम जोशी यांचा अपवाद वगळता, आत्मचरित्रे लिहिली नाहीत. सुदैवाने मधू लिमये यांनी 1947 पर्यंतच्या का होईना आपल्या आठवणी 'आत्मकथा' या नावाने लिहिल्या व मरणोत्तर त्या वागळेकृपेने प्रसिद्ध झाल्या आहेत.
बुद्धीचा सागर असलेला हा माणूस होता तरी कसा? तो माणूस शुष्क राजकारणी होता, तर्ककर्कश व भावनाशून्य होता की अंतर्यामीचे रसाळ झरे सांभाळून होता? केवळ राजकारणांतच रमणारा होता की जीवनातील विविध अंगांना जाणणारा रसिक राजकारणी होता? त्यांचा जीवनविकास कसा घडत गेला व जीवनातील धकाधकींना त्याने कसे तोंड दिले? त्याचा सार्वजनिक चेहरा व व्यक्तिगत चेहरा एकात्म होता की दुभंगलेला? त्याचे जीवनातील विचार झाडावरील फुलाप्रमाणे सहजपणे विकसित झाले की त्याचा कृत्रिम लेप दिलेला आढळतो? हे समजावून घेण्यासाठी व राजकारणातील लिमये हा माणूस म्हणून कसा होता हे जाणण्यासाठी 'आत्मकथा' हे प्रत्ययकारी साधन निर्माण झाले आहे.
लिमयेंनी आठवणी का लिहिल्या असा प्रश्न कोणास पडला तर त्याचे उत्तर त्यांनी देऊनच ठेवले आहे. "तेव्हा संध्याकाळी माझ्याकडे सगळ्यांनी जमायचे ठरविले. 1938 ची 31 डिसेंबर ही तारीख होती. जुने वर्ष मावळत होते. नव्या वर्षाचा उदय होत होता. नवीन संकल्प सोडायचा हा शुभ दिवस होता... बंडूच्या व माझ्या व्यतिरिक्त माधव लिमये, अण्णा साने, विनायक कुलकर्णी व गंगाधर ओगले त्या दिवशीच्या बैठकीत सामील झाले होते... एकमताने आम्ही निर्णय घेतला. आम्ही आपले जीवन राष्ट्रीय स्वातंत्र्य व समाजवादी चळवळ यांसाठी वेचण्याचे ठरविले... हा संकल्प आम्ही प्रामाणिकपणे कितीसा अंमलात आणला? या आठवणी म्हणजे एक प्रकारे त्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीच कहाणी आहे." (पृ. 163-64) या आधीचा भाग त्या संकल्पाप्रत कसा पोहोचलो व आपण कसे घडत गेलो या संबंधीचा आहे. त्याची शिक्षणाची परवड मनात उलघाल निर्माण करते तर स्वशिक्षणाचा प्रयत्न मन विस्मयचकित करून सोडतो.
शिक्षण जेमतेम कॉलेजच्या दुसऱ्या वर्षापर्यंतच परंतु अनौपचारिक शिक्षण मात्र विस्तृत, विविध, सघन व सखोल. त्यांचे पुस्तकांच्या विश्वातील परिभ्रमण थक्क करून सोडते. घरी अभ्यास करून बाहेरून मॅट्रिक परीक्षा द्यायची या वडिलांच्या धोरणामुळे मानसिक अस्वस्थता वाढली. परिणामी दोन वर्षे बराच काळ पुणे नगर वाचन मंदिरात काढला. "नगर वाचन मंदिराची सदस्यता ही माझ्या आयुष्यातील क्रांतिकारी घटना होती... या दोन वर्षातील जास्तीत जास्त वेळ मी पुस्तकांच्या दुनियेत काढला आहे."
मन घडविणाऱ्या पुस्तकांची सविस्तर माहिती मधुर्जींनी दिली आहे. अशा अद्भुत वाचकाचे छायाचित्र नगर वाचन मंदिरात लावून त्यांची सर्व पुस्तके मिळवून तेथे संग्रहित केली पाहिजेत.
20 जून 1937 रोजी लिमये फर्गसन कॉलेजात दाखल झाले. हा माझ्या जीवनातील एक निर्णायक क्षण होता. तेथे सुरवंटाचे फुलपाखरू बनले. कालिदास, शेक्सपीयर, ग्रीक ट्रॅजेडीज ग्रीक व रोमन इतिहास, 1935 ची घटना इत्यादी विषयांबरोबरच नवीन मित्रमैत्रिणींमुळे जीवन बदलून गेले. याच वेळी समाजवादी वर्तुळात प्रवेश होऊन साम्यवादाच्या अभ्यासाकडे कल वळला. 'मला आठवते की कम्युनिस्ट जाहिरनाम्याच्या वाचनाने मी अक्षरशः हादरून गेलो होतो... मार्क्स-एंगल्स यांचे बहुतेक सारे ग्रंथ मी पुढे वाचून काढले. अगदी कंटाळा आणणाऱ्या कॅपिटलचे तिन्ही खंडदेखील.' या अनुषंगाने डाव्या विचारसरणीचे अध्ययन हे प्रकरणही स्वाध्यायाची सखोलता लक्षात आणून देते. 'माझ्या वैचारिक जडणघडणीच्या दृष्टीने महत्त्वाच्या काळात (1937-38) ज्या लेखकांच्या लिखाणाचा मनावर विशेष परिणाम झाला'... अशा त्या काळात वाचलेल्या चाळीस पुस्तकांचा उल्लेख मधुजींनी केला आहे.
पुस्तकांच्या विश्वाशिवाय पुस्तका बाहेरचे जगही लिमयेंना भरपूर पाहाण्यास मिळाले. कासारसाईसारखी खेडी व खेड्यांतील प्रश्न, तुरुंगांतील व बाहेरची माणसे, कार्यकर्ते, कामगार जगत् यांतूनही भरपूर अनुभव व शिक्षण मिळाले.
एसेमनी मधू लिमयेंच्याकडे खानदेश हे कार्यक्षेत्र सोपविले व एक दिवस धुळे येथे त्यांना घेऊन गेले. ही घटना 'माझ्या आयुष्याला निर्णायक व स्थायी दिशा देणारी घडली' असे त्यांनी म्हटले आहे. तेथे कम्युनिस्टांच्या चालबाजीला तोंड देत व हालअपेष्टा सहन करीत 17 वर्षे वयाच्या मधू लिमयेंनी काम सुरू केले.
'आम्हां कार्यकर्त्यांपुढे उपजीविकेचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न असे. थोडीशी मदत पक्षनेते करीत होते पण तेवढ्याने भागणारे नव्हते. मुख्य प्रश्न प्रवासखर्चाचा असे. खिशात दिडक्या नसल्या की फिरती आपोआप बंद होई. आजच्या नवीन कार्यकर्त्यांना हे वाचून प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. खरा कार्यकर्ता प्रथम जबाबदारी व मग व्यवस्था असाच विचार करेल. माझ्यासारख्याला, ज्याने मधू लिमयेंना - 1946 पासून नेता म्हणूनच पाहिले, त्यालाही मधुजींची कष्टदायी उमेदवारी प्रेरक वाटते.
खानदेशमधील देवकीनंदन यांच्या नेतृत्वाखालचे जुन्या वळणाचे काँग्रेसवाले आणि कॉ. सरदेसाई कॉ. नांदेडकर यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाला आतून सुरुंग लावू पाहणारे कम्युनिस्ट यांचाही विपुल अनुभव लिमयेंना आला. बैलगाड़ी, टांगा, बस, सायकल अशा मिळेल त्या वाहनाने व कित्येक वेळा पायी प्रवास करून त्यांनी युद्धविरोधी प्रचार केला व वर्षाची सक्तमजुरी ओढवून घेतली.
धुळे जेलमध्ये साने गुरुजींशी परिचय झाला व जीवनभरचा ऋणानुबंध जडला. गुरुजींबद्दलचा मधुजींच्या मनातील हळुवारपणा मनाला चटका लावतो. '1 सप्टेंबरला (1941) महात्मा गांधींच्या अपूर्व अशा राष्ट्रीय विश्वविद्यालयाचा पदवीधर बनून मी धुळ्याच्या तुरुंगातून बाहेर पडलो.'
परंतु या पदवीपेक्षाही त्यांनी महान कार्य केले ते म्हणजे कम्युनिस्टांबद्दल आकर्षण निर्माण झालेल्या साने गुरुजींचे त्यांनी पूर्ण मतपरिवर्तन केले.
याशिवाय संगीत, नाट्य व भाषा यांचा मधुजींनी केलेला अभ्यास मोठा मनोवेधक आहे. संगीत व नाट्य यांच्या आवडीचे बाळकडू घरातच मिळालेले. वडील स्वतः संगीत शिक्षकही होते आणि घरात बालगंधर्व, मास्तर कृष्णा, रहिमतखाँ, अब्दुल करीमखाँ, बंदेअलीखाँ इत्यादींबद्दल चर्चा चालत. मधुजींनी या आवडी जीवनभर जोपासल्या. नृत्यकलेतील ते किती जाणकार होते व सटीक विश्लेषण व मार्गदर्शन कसे करू शकत हे स्वतः श्रीमती सोनल मानसिंग यांनी श्रद्धांजली सभेत साश्रू नयनांनी सांगितले होते.
हा शुष्क राजकारणी नव्हता, तर अंतःकरणात साहित्य, काव्य, संगीत, नृत्य, नाट्य इत्यादींबद्दल अंतरीचे प्रेम बाळगणारा रसिक होता हे 'आत्मकथा' स्पष्टपणे लक्षात आणून देते. सृष्टिसौंदर्याने देहभान हरपून टाकणारे समृद्ध मनही अस्थम्याने जराजर्जर झालेल्या त्या अंतःकरणात होते हे पाहून आपलेही मन प्रसन्न होते.
राष्ट्रीय स्वातंत्र्य व समाजवादी चळवळ यांसाठी जीवन व्यतीत करण्याचे ठरविल्यामुळे आत्मकथेचा बहुतांश भाग त्यावर खर्च होणे स्वाभाविकच आहे. 1937 ते 1947 या दशकातील घटनांचा विशाल पट आपणास आत्मकथेमध्ये आढळतो. 1937 मध्ये दुसऱ्या महायुद्धाचे काळे ढग झपाट्याने जमू लागले होते. हुकूमशहा हिटलर मुसोलिनीबरोबर म्युनिच करार करून आपण युद्ध टाळले ही ब्रिटीश पंतप्रधान चेंबरलेनची समजूत भ्रामक ठरली.
या जागतिक प्रक्षोभक पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारे स्थापन झाली व त्यांनी व्हाइसराय-गव्हर्नर यांच्या सत्तेला आव्हान देण्यास सुरुवात केली. काँग्रेस सरकारांच्या इच्छेनुसार अंदमानातील बंदींना ब्रिटीश सरकार सोडेना म्हणून पंडित नेहरू यांनी देशभर 14 ऑगस्ट 1937 रोजी 'अंदमान डे' पाळण्याचे आवाहन केले.
केवळ सत्ताप्रवेशामुळेच नव्हे तर बहुजन समाजाच्या प्रवेशामुळे काँग्रेसचेही स्वरूप आमूलाग्र बदलू लागले होते. इकडे काँग्रेस समाजवादी पक्षाने कम्युनिस्टांना पक्षात सामील करून संयुक्त आघाड्यांचा प्रयोग सुरू केला होता. तिकडे मॉस्को खटल्यामुळे कम्युनिस्टांचे सत्य स्वरूप उघड होऊ लागले होते.
या व्यापक व खळबळजनक पार्श्वभूमीवर फर्गसनचे बुद्धिमान व जिज्ञासू विद्यार्थी मधू लिमये यांची डिसेंबर 1937 मध्ये एसेम जोशीबरोबर पहिली भेट झाली व त्यांचा समाजवादी वर्तुळात प्रवेश झाला. कोस्लरने आपल्या 'अँरो इन द ब्ल्यू' मध्ये अशीच आपली जन्मकुंडली मांडली आहे. आपल्या पृष्ठभूमीचा इतका व्यापक विचार वयाच्या 15 व्या वर्षी करणारे मधू लिमये श्रेष्ठ राजकीय नेते बनले यात काय आश्चर्य!
1937 नंतर तर जागतिक व राष्ट्रीय घटनांनी बेफाम वेग धारण केला. त्या खळबळजनक प्रवाहात सहजपणे उडी मारून समर्थपणे पोहण्याचे सामर्थ्य मधुजींनी त्या वेळी संपादन केले हे खचितच वैशिष्ट्यपूर्ण आहे. जागतिक घटना, काँग्रेसचे राजकारण, काँग्रेस व परकीय सत्ता यांच्यातील संघर्ष, काँग्रेस आणि लीग - हिंदू महासभा यांच्यातील ताण-तणाव, काँग्रेसमधील अंतर्गत हेवेदावे, डाव्या-समाजवादी, रॉयवादी, कम्युनिस्ट इत्यादी पक्षांचे डाव-प्रतिडाव, त्या- त्या पक्षांतर्गत असलेले वाद, समाजवादी नेत्यांतील भेद, एक ना दोन असंख्य मुद्यांचा परामर्श प्रवाही शैलीत मधुजींनी घेतला आहे.
बहुसंख्य समाजवादी नेत्यांप्रमाणेच सुरुवातीस कट्टर मार्क्सवादी असलेल्या लिमयेंचा भ्रमनिरास 1938-39 च्या सुमारास इतरांच्या खूप आधीच खानदेशातील अनुभवामुळे झाला, हेही विशेष आहे. 1939 साली ऑगस्टमध्ये रिबेनट्रॉपने जर्मन- रशिया करारावर सही केली व युद्धविरोधी कम्युनिस्ट बदलू लागले.
कॉ. सरदेसाई यांनी एक गुप्त पुस्तिका 'अनमास्कड्: पार्टीज अँड पॉलिटिक्स' लिमयेंना जाळ्यात खेचण्यासाठी दिली. विषयाचे महत्त्व ध्यानी घेऊन त्या पुस्तिकेची प्रत करून त्यांनी एसेमकडे पाठवून दिली. परिणामी जेपींनी संयुक्त आघाडीचा प्रयोग निकाली काढला आणि समाजवादी व कम्युनिस्ट यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. पुढे तर त्यांनी 'कम्युनिस्ट पार्टी : फॅक्टस् अँड फिक्शन' हे अप्रतिम पुस्तक लिहिले. त्याच मधुजींनी पुढे 'सोशलिस्ट कम्युनिस्ट इंटरेक्शन इन इंडिया' या 1991 मध्ये प्रसिद्ध झालेल्या उत्कृष्ट ग्रंथांत रशियाच्या पाडावानंतर ऐक्याची गरज मांडली आहे. मधू लिमये हे पूर्वग्रहांना कधीच चिकटून राहिले नाहीत.
चलेजाव चळवळीची पार्श्वभूमी, त्या वेळचे विविध वादविवाद, गांधी नेहरू यांच्यातील मतभेद, गांधी व समाजवाद्यांतील जवळीक आणि गांधीजींचे प्रभावी नेतृत्व यांची वर्णने प्रभावी व चिकित्सक झाली आहेत.
युसुफ मेहरअलीमुळे आपण भाषण करणाऱ्या गांधीजींपर्यंत हळूहळू कसे पुढे सरकत गेलो, हे तारुण्यसुलभ वर्णन जसे वाचण्यास मिळते तसेच 'क्विट इंडिया' ही घोषणा युसुफमुळे कशी प्रचलित झाली तेही वाचण्यास मिळते. '1941-42: अंतिम स्वातंत्र्यलढ्याची पूर्वसंध्या' आणि 'क्रिप्सची विफल शिष्टाई आणि भारत छोडोचा संदेश' ही दोन्ही प्रकरणे तसेच भूमिगत कार्याचा तपशील अत्यंत मनोवेधक बनला आहे
18 एप्रिल 1943 रोजी मूषक-महालाचे पतन झाले आणि नानासाहेब, शिरुभाऊ व साने गुरुजी पकडले गेले. सप्टेंबर 1943 मध्ये हडळ-हाऊसवर धाड आली व एसेम, विनायकराव, डेंगळे व लिमये हे गिरफदार झाले. श्री. नरूभाऊ लिमये यांनी 'जागृत सातारा' या लेखात 'मूषक महाल'चा संदर्भ दिला आहे. 'एसेम, शिरूभाऊ, अच्युतराव, लोहिया प्रभृती तेथे जमत. पुढील आखणी तेथेच उंदरासारखे बिळांत राहून करण्यात आली'. असे काहीसे अनुदार शब्द त्यांनी लिहिले आहेत. 'आमचे भूमिगत जीवनदेखील बिळांत राहणाऱ्या उंदरांप्रमाणेच नव्हते काय असे उद्गार भूमिगत नेते एसेमनी काढणे वेगळे व सातारा जिल्ह्यातील लढा गांधीजींच्या मर्यादा सांभाळून चालला' असे आग्रहपूर्वक प्रतिपादन करणाऱ्या नरूभाऊंनी काढणे वेगळे. भूमिगत आंदोलनाबद्दलची वेगळी मते स्पष्टपणे त्यांनी मांडली असती तर मी आक्षेप घेतला नसता.
'आत्मकथा'मध्ये असंख्य व्यक्तिचित्रणे व स्थलवर्णन आलेली आहेत आणि ती चपखलपणे एकूण निवेदनात सामावलेली आहेत. पुणे, सातारा, अंमळनेर, धुळे व दिल्ली यांची वर्णने 50-60 वर्षापूर्वीची असल्याने एका अर्थी ऐतिहासिक आहेत. मुंबईचे वर्णन मात्र फारसे नाही.
गांधी, नेहरू, सुभाष, रॉय, आंबेडकर व जीना यांचे संदर्भ महत्वाचे आहेत. रॉयवाद्यांबद्दल - ज्यांना कुचेष्टेने रायवळ म्हटले जाई - सविस्तरपणे लिहिले आहे. सुभाषची भेट मनोवेधक वाटते, 'बैठक संपेपर्यंत वयस्कापासून पोरांपर्यंत सर्व सुभाषबाबूंच्या लोहचुंबकीय व्यक्तिमत्त्वाने आकृष्ट झाले होते.
डॉ. आंबेडकरांचे 'रानडे, जीना व गांधी' हे व्याख्यान ऐकण्याची संधी त्यांना मिळाली होती. 'डॉ. आंबेडकरांच्या भाषणातील परखडपणा, विद्वत्ता आणि आवेश ही तिन्ही वैशिष्ट्ये मला आवडली. किंबहुना, आंबेडकर व राष्ट्रवादी जीना यांची बाजू घेऊन मी माझ्या तरुण सहकार्यांशी कडाक्याचा वाद घालत असे', असे त्यांनी म्हटले आहे. 'मला आंबेडकरांच्या गांधीविरोधात अस्पृश्यांवरील हजारो वर्षांच्या अन्यायाची चीड प्रतिबिंबित होत आहे असे मनोमन वाटे.' यामुळेच 'प्राइम मुव्हर्स' या त्यांच्या एका नामांकित ग्रंथातील आंबेडकरांवरील प्रकरण आपलेपणातून सरस उतरले आहे.
वास्तविक 1946 च्या कानपूर अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणात डॉ. लोहियांनी जातिप्रथेवर कडाडून हल्ला चढविला होता. परंतु त्याबाबत समाजवादी पक्षाने विशेष हालचाल केली नाही. अन्यथा 1956 पूर्वीच आंबेडकरांशी समीपता निर्माण झाली असती.
स्वाभाविकपणेच व्यक्तिचित्रणांत आ. नरेंद्र देव, जेपी, अच्युतजी, लोहिया, मसानी, युसुफ मेहेरअली, अशोक, नानासाहेब, साने गुरुजी, एसेम व ताराबाई या समाजवादी मंडळींवर अधिक प्रकाशझोत आहे. ही सर्वच व्यक्तिचित्रणे सरस उतरली आहेत.
विशेषतः साने गुरुजी व एसेम या दोन व्यक्तिचित्रणाने आत्मकथा संपन्न बनली आहे. साने गुरुजी व मधु लिमये यांचा मधुर संबंध हा फार मोठा लोभस विषय आहे. साने गुरुजींची अप्रकाशित पत्रे प्रकाशित करून बागाईतकर व्याख्यानमालेने मोठे कार्य केले आहे. एसेम जोशी यांच्याबद्दलचे संदर्भही असेच हृदय आहेत. 14 ऑगस्ट 1937 रोजी एसेमचे पहिले दर्शन झाले. 'आता एसेम जोशी बोलायला उभे राहिले. उंच, गौरवर्णी, सडसडीत बांधा. भाषणात शब्दांची आतषबाजी अथवा वर्क्तृत्व असे फारसे नव्हते. पण कळकळ व प्रामाणिकपणा वाक्यावाक्यांतून ओसंडत होता.' पहिली भेट डिसेंबरच्या प्रारंभी झाली. 'त्यांची खोली साधीच पण नीटनेटकी होती. कॉट, पुस्तकांचे रॅक, टेबल खुर्ची बस्स. एवढेच सामान होते.'
मधू लिमयेंनी अगदी भारावलेल्या शब्दांत लिहिलेले आहे की, 1937 ते 39 या दोन-अडीच वर्षात त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या सहानुभूतीची पाखर मला लाभली. माझे व्यक्तिमत्त्व घडविण्यात त्यांचा मोठा हात आहे. बौद्धिक मार्गदर्शनापेक्षाही त्यात भावनात्मक ओलावा, प्रोत्साहन, कौतुक नि आपुलकीचा भाग अधिक होता. माझ्या किशोरावस्थेत तरी त्याचीच मला विशेष गरज होती. या दोन वर्षांत एसेमनी शिक्षक, मित्र, वडीलभाऊ, माता या सर्व भूमिका एकसमयावच्छेदेकरून माझ्या बाबतीत पार पाडल्या असे मी म्हणू शकतो." (पू. 107) एसेम : जैसा मैने समझा' या प्रो. विनोद सिंह यांच्या पुस्तकात उद्धृत केलेल्या हिंदी लेखातही अशीच आदरयुक्त भावना व्यक्त झाली आहे. किंबहुना आयुष्याच्या अखेरपर्यंत मधुजींची ही भावना कायम राहिली याचा मी एक साक्षी आहे.
पत्नी चंपाताई व पुत्र अनिरुद्ध यांचा उल्लेख करताना मधुजींचे शब्द किती नाजुक, संयत व हळुवार बनतात! "पण तरीदेखील तिच्याशी मुद्दाम ओळख करून घेण्याचा प्रयत्न मी केला नाही, पण पंधरा दिवस 'आमने सामने' बसल्यामुळे काही विद्युतप्रवाहांनी अज्ञातपणे संचार केला असेल तर नकळे!... पण गुलाबी व पोपटी रंगाच्या जरीचे काठ असलेल्या साड्या ती आलटून पालटून नेसत असे ही तिची आठवण चूक होती असे माझ्याने म्हणवत नाही!"
नेत्याप्रमाणेच बंडू गोरे, विनायकराव, माधव लिमये इत्यादी सहकारी, भावसार, दगडू लोहार इत्यादी कार्यकर्ते, आप्पा बॉर्डर आणि परश्या दगड्या हे अल्पवयीन भुरटे चोर तसेच अनेक नातेवाईक यांची शब्दचित्रे मनाला भावतात.
आत्मकथाचे वैशिष्ट्य निवेदनशैलीत आहे. त्या त्या परिस्थितीप्रमाणे व व्यक्तीनुसार शब्दही हळुवार, संयत, मधुर, कठोर अथवा विवेचक रूप घेतात. मधुजी कधी महान वक्ते वाटले नाहीत. तरीही त्यांचे कोणतेही भाषण कधी निस्तेज होत नसे. कारण विलक्षण अशी स्मरणशक्ती, अफाट अध्ययन, मुद्याच्या पुष्ट्यर्थ पुढे मांडले जाणारे विपुल पुरावे आणि स्तिमित करणारी विश्लेषणात्मक बुद्धी यांचा एकत्रित परिणाम मनाचा कब्जा घेणारा ठरे.
आम्ही मित्रांनी आयोजित केलेले त्यांचे रशियाच्या पाडावाबाबतचे भाषण असेच गाजले. कोठे विनोद, अन्य फाफटपसारा नाही. परंतु असंख्य संदर्भ व बिनतोड विवेचन यांमुळे देशभर त्या व्याख्यानाचे पडसाद घुमले. आत्मकथा बरेचसे तसेच पकड घेणारे उतरले आहे. मात्र या वेळी नर्मविनोद, भावनास्निग्ध शब्द यांमुळे विशेष बहार आली आहे.
आत्मकथा पहिल्या स्वातंत्र्यदिनापर्यंतच आहे. खरे तर 1947 ते 1995 हा महत्त्वाचा भाग राहिलाच. हे खरे की अनेक ग्रंथांमधून अगदी जनता प्रयोग, अयोध्या व हवालापर्यंत आले आहे. परंतु आत्मकथेतून याच बाबी विशेष रूप धारण करून आल्या असत्या यात शंका नाही. समाजवादी चळवळीचा इतिहास स्वतंत्रपणे लिहायचा ठरवूनही राहून गेला. आता हे काम कोण करणार? निदान प्रेम भसीन यांनी हे काम हाती घेतले तर काय बहार येईल!
आत्मकथा प्रसिद्ध करताना चंपाताईंना किती अडचणी आल्या. प्रकाशकच मिळेना, सुदैवाने निखिल वागळेंनी मनावर घेतले म्हणून त्यांना खास धन्यवाद दिले पाहिजेत. हे पुस्तक चंपाताईंनी एसेम व साने गुरुजींना अर्पण करून मोठे औचित्य साधले आहे, कारण या खंडाच्या त्या अधिष्टात्री देवताच आहेत.
आपल्या नेत्यांबद्दल आदरभाव व्यक्त करून मधुजी म्हणतात, "एसेम, जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया यांनी मला राजकीय मंचावर खेचून आणले. महत्त्वाच्या प्रसंगी पुढे रेटले, प्रकाशाच्या झोतात आणून सोडले हे सत्य आहे. या पुढाऱ्यांनी माझ्या जीवनवेलीचे सिंचन केले नसते तर स्वतः धडपड करून अथवा इतरांना बाजूला सारून सार्वजनिक जीवनात मी कधीच पुढे सरसावलो नसतो. माझा तो स्वभावच नव्हता." सर्व भारतीय यासाठी या नेत्यांना खास धन्यवाद देतील यात शंका नाही.
आत्मकथा
मधू लिमये
अक्षर प्रकाशन, माहीम, मुंबई.
किंमत : रु. 250/-
Tags: राममनोहर लोहिया जयप्रकाश नारायण एसेम जोशी साने गुरुजी चंपा लिमये मधू लिमये Rammanohar Lohia Jaiprakash Narayan S.M. Joshi Sane Guruji Champa Limaye Madhu Limaye weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या