डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत

प्रत्येक क्रांतिकारक पुनर्रचनेचा कार्यक्रम राष्ट्रापुढे ठेवू शकतोच असे नाही. पण भारतीय स्वातंत्र्याचे लढे सत्तावीस वर्षे देताना, या लढ्याची तयारी करताना, म. गांधींनी आपल्या रचनात्मक, विधायक कार्यक्रमांद्वारा व आपल्या वृत्तपत्रीय लेखनातून व भाषणांतून राष्ट्रबांधणीचे व पुनर्रचनेचे स्पष्ट ध्येय व स्वरूप भारतापुढे ठेवले.

1920 साली लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर भारतीय स्वातंत्र्याची चळवळ करून, स्वराज्य स्थापन करण्याचे कार्य महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशाने केले. राष्ट्राचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्यापासून अवघ्या 27 वर्षांत राष्ट्र स्वतंत्र झाले. स्वराज्यप्राप्तीनंतर आज 45 वर्षांत, स्वतंत्र भारताला अनेक संकटांना, तणावांना तोंड द्यावे लागत आहे. सीमा भागात तणाव असून परकीय सत्ता ते वाढवीत आहेत. राष्ट्रांतर्गत सामंजस्य नाही. जातीय समस्या सुटावी म्हणून अखंड भारताचे विभाजन पत्करूनही, पुन्हा जातीय तेढ संपलेली नाही. 

जनसामान्यांच्या भौतिक गरजाही भागवण्याचा प्रश्न सुटलेला नाही. या समस्यांना कारणीभूत असलेला, ‘स्पिरिच्युअल क्रायसिस’ वाढत आहे. निराशा वाटावी, प्रश्नचिन्हांकितता भेडसवावी अशा कालखंडातून आपण जात असलो तरी या कसोटीच्या क्षणी, इतिहास व त्यात कार्य केलेले नेते यांच्यापासून प्रेरणा, मार्गदर्शन घेऊन, स्वतंत्र भारत प्रगत करावयाचा आहे.

भारताबाबतच्या आपल्या अपेक्षा, आजच्या आपल्या संकटांच्या मालिकेवर मात करून पूर्ण करण्याची प्रेरणा देणारे महात्मा गांधीजींचे चरित्र आहे. म्हणून त्यांनी स्वराज्याची चळवळ का केली, त्यांना कशाप्रकारे स्वतंत्र भारताला आकार द्यावयाचा होता, याचा आज आपणास विचार करावयाचा आहे. ब्रिटिशांना भारताबाहेर घालवून, राजवटीचा साचा तसाच ठेवून, गोऱ्यांऐवजी काळे प्रतिनिधी यावेत, एवढीच त्यांची अपेक्षा नव्हती. इतिहासात आजवर ज्या क्रांत्या झाल्या, त्यांतील काही व्यक्ती बदलण्याकरिता, तर काही राज्यकारभार बदलण्याकरिता झाल्या.

प्रत्येक क्रांतिकारक पुनर्रचनेचा कार्यक्रम राष्ट्रापुढे ठेवू शकतोच असे नाही. पण भारतीय स्वातंत्र्याचे लढे सत्तावीस वर्षे देताना, या लढ्याची तयारी करताना, म. गांधींनी आपल्या रचनात्मक, विधायक कार्यक्रमांद्वारा व आपल्या वृत्तपत्रीय लेखनातून व भाषणांतून राष्ट्रबांधणीचे व पुनर्रचनेचे स्पष्ट ध्येय व स्वरूप भारतापुढे ठेवले. जगात युद्धाला सत्याग्रहाचा पर्याय आचरून दाखवणाऱ्या म. गांधींच्या राष्ट्रीय पुनर्रचनेच्या कार्यक्रमाकडे व मार्गाकडे प्रगत राष्ट्रेही उत्कंठेने व आशेने आज पहात आहेत.

“It is the greatest imperative of our time to return to Gandhi.” असे आग्रही मत जयप्रकाश नारायण यांनी मांडले आहे. महात्माजींचे सार्थ दर्शन घडवताना प्रा. शं.कु. सोहोनी म्हणतात -

जीवनी बुद्ध हा, ख्रिस्त मृत्यू मधे। 
कर्म योगेची हा कृष्ण की भासतो ॥ 
फकीरा असे महमदी त्याची वृत्ती। 
सत्य धर्मेची हा पारशी वाटतो।

अशा महात्माजींना, स्वतंत्र भारताचे चित्र जसे उभे करायचे होते, तसे स्वराज्यप्राप्तीनंतर ते देशाला अत्यल्प काळच लाभल्याने, प्रत्यक्षात, पूर्णत: चितारू व साकार शकले नसले तरी त्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी माणसे तयार करताना, जो रचनात्मक, विधायक कार्यक्रम अंमलात आणला त्यावरून नवभारताचे त्यांचे स्वप्न व ते साकार करण्याचा त्यांचा मार्ग त्यांनी राष्ट्रापुढे स्पष्टपणे ठेवला आहे.

स्वतंत्र भारताचा, ग्रामस्वराज्याचा आधारभूत घटक म्हणजे नागरिक. तो नि:स्वार्थी असावा, सेवातत्पर असावा, समाजसेवा म्हणजेच ईश्वरसेवा मानणारा असावा. तो विषमता, भेदाभेद मानणारा नसावा, त्यागी असावा, शरीरश्रमाचे पावित्र्य मानणारा तो असावा, नीतिमत्ता हा त्याचा आश्रय असावा आणि रंजल्या- गांजलेल्यांना मदत करणारा असावा. गाव हे आपलेच कुटुंब आहे..., अशी त्याची श्रद्धा असावी. कांचन, कामिनी, अपेयपान, लाचलुचपत यांपासून तो अलिप्त असावा, कष्ट करूनच जगणारा, स्वावलंबी असावा. हे सर्व महात्माजींचे स्वराज्याच्या आद्य घटकाचे (नागरिकाचे) निष्कर्ष होते. अभ्यास, तप, आश्रमवास, प्रातःकाळी व सायंकाळी प्रार्थना, एकादश व्रताचे कठोर पालन यांतून भारताचा नागरिक घडवण्याची त्यांची कल्पना होती. 

असे निर्भय, ध्येयवादी, सत्यनिष्ठ, हालअपेष्टांची पर्वा न करणारे, सर्वस्वाचा होम करून आत्मविलोपन करणारे सैनिक त्यांनी स्वराज्याच्या लढ्यासाठी तयारच केले होते. त्यांना याच दृष्टीने शिक्षणाची पुनर्रचना करावयाची होती मूलोद्योग शिक्षण परिस्थितीनुसार, गरजेप्रमाणे त्यांच्या मूळ योजनेत फेरफार करून आपण दिले असते तर, आजची शिक्षित बेकारांची संख्या काही कोटींच्या घरात गेली नसती व बेकारभत्ते आदी दान वाटण्याचा प्रसंगही आला नसता. 

महात्मा गांधींनी आश्रमात चालवलेल्या विद्यालयांत शिक्षणक्रम पुरा होईतोवर 10 वर्षे मातापित्यांचे दर्शन वर्ज्य होते. शिक्षणातून सत्य, अहिंसा, समाजाभिमुखता, भ्रातृभाव, संयम, स्वावलंबन आदी गुणांचे संस्कार होत. विद्यार्थ्यांनी ऐट, चैनबाजी, नाजुकपणा न करता, आत्मसंयम जोपासावा. भाषांचे पुस्तकी ज्ञान कमी पडले तरी चालेल. मनाने, शरीराने, कृतीने शुद्ध नसलेल्या विद्यार्थ्यास महात्मा गांधींच्या दृष्टीने शिक्षणसंस्थेत स्थान नव्हते. शुद्ध मन, स्वच्छ हात, सरळ नजर ही खऱ्या तरुणांची, विद्यार्थ्यांची लक्षणे हे महात्माजी मानीत. विद्यार्थ्यांनी रात्री-दिवसा, सुट्टीत वर्ग चालवून, अज्ञान घालवावे; देतील त्या हरिजनांचे सहकार्य घेऊन हरिजन वसाहती स्वच्छ कराव्यात; हरिजन मुलांच्या सहली काढून त्यांना भूगोल, निसर्ग, इतिहास यांचे थोडेफार ज्ञान द्यावे; हरिजनांना, त्यांच्या मुलामुलींना आरोग्याचे, स्वच्छतेचे सोपे सोपे ज्ञान द्यावे ; दुःखित हरिजनांची सेवा करावी असे ते मानीत.

भावजीवन पुष्ट करण्याकडे, आत्म्याचे ज्ञान देण्याकडे गांधीजींचा आग्रह होता. ते न देता, आजच्या शिक्षणातून भोगजीवनावर भर दिल्याने, समाजाचा नैतिक पाया उखडला जाऊन मत्सर, स्वार्थ, लोभ, द्वेष, जीवघेणी स्पर्धा, मूल्यांचे अवमूल्यन, भ्रष्टाचार सतत वाढत आहेत. इंग्रजांनी भारतात सुरू केलेल्या साच्याचे शिक्षण न मिळते तर लो. टिळक, राजा राममोहन आणखी अधिक थोर झाले असते, असे महात्माजींचे मत होते. ज्या शिक्षणात भुकेने मरणाच्या गरिबांचा विचार नाही, जे शिक्षण गरिबी हटवीत नाही, ते राष्ट्रीय शिक्षणच नव्हे, असे ते मानीत. म्हणूनच मेकॉलेछाप शिक्षण बंद झाल्यास, काही नुकसान होणार नाही, असे ते प्रतिपादित. भारताचा आध्यात्मिक वारसा, भारताची आर्थिक स्थिती, भारताची लोकसंख्या या सर्वांचा विचार करून, भारतीय संस्कृतीचा वारसा जाणून, त्यांत भर घालणारे, भारतीय तिजोरीला परवडणारे, मूठभरांना नव्हे तर आमजनतेला देता येईल- घेता येईल असा शिक्षणाचा आराखडा आखावा, यासाठी त्यांनी आग्रह धरला.

“शहरे म्हणजे भारत नव्हे. त्यातील सात लाख खेडी म्हणजे खरा हिंदुस्थान आहे. खेड्यांचा नाश झाला तर हिंदुस्थान नष्ट होईल. खेड्यांची लुबाडणूक थांबवली, तर त्यांचे पुनरुज्जीवन करणे अशक्य नाही,” असे गांधीजींनी प्रतिपादिले. 1922 साली अहमदाबादच्या न्यायालयात स्वतःचा व्यवसाय, ‘शेतकरी व विणकरी’ असल्याचा जबाब देणाऱ्या महात्माजींनी, अत्यंत उष्ण अशा शेगावमध्ये आपला आश्रम थाटला व त्या खेड्याचे रूप एवढे बदलले की लोकांनी त्याचे नाव ‘सेवाग्राम’ ठेवले. भारताच्या अत्यंत गरीब भागातील, अत्यंत गरीब खेडे मला वसतिगृहासाठी हवे असे सांगून त्यांनी हे गाव निवडले. स्वावलंबनाने, ग्रामीण भागाला शोभेसे हॉस्पिटल, शाळा, झोपड्या तेथे उभारल्या व ते सेवास्थान बनवले. सेवाग्राम पाहून भारतातील माजी अमेरिकन राजदूत चेस्टर बाउल्स म्हणाले, “Sevagram is clean, healthful and full of purpose and I always come away, refreshed and invigourated. It is a place, where peace is natural and human dignity is fully recognised. The simplicity of Sevagram made complete sense in the light Indian condition.”

“सेवाग्रामची रचना स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि उद्दिष्टे पूर्ण करणारी आहे. तेथून ताजातवाना होऊन आणि स्फूर्ती घेऊनच मी परततो. ते ठिकाण असे आहे की जिथे शांती आणि मानवी प्रतिष्ठा सहज प्रस्थापित झालेली आहे. भारतीय परिस्थितीच्या संदर्भात सेवाग्रामचा साधेपणा सहजपणे उठून दिसतो.”) महात्माजींचे खेड्यांवर अपार प्रेम होते. राजसत्तांच्याकडून होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जुलमांना तोंड देण्यासाठी कौतुकास्पद संघटनाशक्ती उत्पन्न करण्याचे साम्य असलेल्या ग्रामांत समाजव्यवस्था करण्याचे सामर्थ्य होते. खरी भारतीय संस्कृती महात्माजींना खेड्यात दिसे. पाश्चिमात्यांच्या नकला असलेली आमची शहरे तेथे टिकणार नाहीत. ग्रामीण हस्तोद्योगाची संस्कृती टिकणार आहे, काळाच्या कसोटीला उतरणार आहे. रेल्वेपासून दूर खेड्यात जा, तेथे भारताचा गाभा व लोकांत अशी संस्कृती दिसेल की, जिचा तुम्हाला पाश्चात्य देशांत पत्ताही लागणार नाही. तेथे सुसंस्कृतपणा, जिवंत कलेचा अवशेष दिसेल. 

भारतीयांत पुष्कळ धर्मभोळेपणा, अज्ञान दिसले तरी त्यांच्या अंतरी खोल ईश्वरश्रद्धा आहे आणि तीच धर्मप्रेरणा आहे. तुम्ही खेड्यांतल्या लोकांशी बोलू लागा व ते तुमच्याशी बोलू देत की, त्यांच्या मुखातून ज्ञान पाझरत असलेले तुम्हाला आढळून येईल. त्यांच्या वरवरच्या अपक्वतेमागे, आध्यात्मिकतेचा खोल खजिना आढळेल. हिंदुस्थानच्या खेड्यांच्या अडाणीपणाच्या कवचाखाली युगांतरीची सुसंस्कृतता दडलेली असते.

सत्याच्या शोधार्थ आशिया खंडाच्या निरनिराळ्या भागांत तीन फ्रेंच शास्त्रज्ञ निघाले असता, भारतात आले. उच्च वर्गाच्या स्त्री पुरुषांना एकजण भेटला असता, त्याला सत्य गवसले नाही. तेव्हा गरीब खेड्यातल्या साध्या भंग्याच्या घरी गेला असता, त्या फ्रेंच शास्त्रज्ञाला हवे असलेले सत्य सापडले. भारतीय ग्रामाबद्दल अशी अपार श्रद्धा असलेल्या महात्माजींनी, खेड्यांच्या उद्धाराचा परिपूर्ण, सर्वांगीण, आर्थिक, सामाजिक, शासकीय, आदर्श कार्यक्रम देऊन, ग्रामस्वराज्य स्थापनेचा आग्रह घरला. पंडित नेहरूंना, ते हंगामी सरकारचे पंतप्रधान होण्यापूर्वी 1945 साली महात्मा गांधींनी लिहिले: “जर हिंदुस्थानला व हिंदुस्थानच्याद्वारा जगालाही खरे स्वातंत्र्य मिळावयाचे असेल तर लोकांना खेड्यांत राहावे लागणार आहे. राजवाड्यांत नव्हे, तर झोपड्यांत राहावे लागणार आहे. ग्रामीण जीवनातील साधेपणामुळेच. सत्य-अहिंसा आपणास प्रत्यक्षात आणता येईल. हा साधेपणा ‘चरखा’ व त्याने ध्वनित होणाऱ्या सर्व गोष्टींत, उत्तम रीतीने आढळून येण्याजोगा आहे.”

“माझ्या आदर्श खेड्यात, बुद्धिमान माणसे असतील. ती जनावराप्रमाणे घाणीत वा अंधारात राहणार नाहीत. स्त्री-पुरुष स्वतंत्र असतील. जगातल्या कोणाहीपासून आपले रक्षण करण्यास समर्थ असतील. या खेड्यात प्लेग, कॉलरा, देवी असणार नाही. कोणी आळशी राहणार नाही. कोणी चैनीत लोळणार नाही. प्रत्येकाला आपला श्रमाचा वाटा द्यावा लागेल. आमच्या देशाचे अध्यक्ष नि आमचे पंतप्रधान शेतकऱ्यांतून घेतले पाहिजेत.”

“ज्यांच्याकडून जी कामे अपेक्षित आहेत, त्यांचे त्यांना ज्ञान असल्यास, उच्च दर्जाच्या सचिवालयांतील जागा शेतकऱ्यांना देण्यात याव्यात, अशा प्रकारचे शेतकरी पुढे आल्यास, मी मंत्र्यांना व इतरांना जाहीरित्या, त्यांना जागा करून देण्यास सांगेन.” ग्रामोद्धाराचा तपशीलवार कार्यक्रम त्यांनी राष्ट्रापुढे ठेवला व शक्य तेथे तो अंमलात आणला. प्राचीन भारतात खेडीही स्वतंत्र लोकसत्ताक राज्ये होती. इंग्रजी सत्तेमुळे व नागरजनांमुळे खेड्यांची दुर्दशा झाली. इंग्रजांनी खेड्यांची लूट करण्यास मदत केली. आपल्याला हीच खेडी पुन्हा आदर्श बनवावयाची आहेत. भारताचे वैशिष्ट्य असलेल्या अहिंसेवर, भारताची उभारणी करावयाची तर लोकवस्तीचे स्वरूप व प्रमाण, लहानच म्हणजे ग्रामाचे असले पाहिजे. 

ग्रामीणजनांच्या प्रयत्नानेच आजचे खेड्यांचे ओंगळ रूप बदलावयाचे आहे. घरगुती उपचारांनी आजार बरे करणे, साधा सात्विक आहार घेण्याची सवय लावणे आवश्यक आहे. कसून शेत करून, जरूर तेवढे धान्य उत्पादन केले पाहिजे. धान्य आयात बंद केली पाहिजे. सहज मिळणाऱ्या खतांचा त्यासाठी वापर व्हावा. छोट्या छोट्या एकेकाच्या शेतीपेक्षा सहकारी शेतीने जास्त लाभ होतो. कष्टणाऱ्या शेतकऱ्यांना पुरेशी जमीन मिळाली पाहिजे. आपल्या जीवनाशी व शेतीशी संबंध असलेल्या गुरांची आपण विशेष काळजी घेणे जरूर आहे. भारतीय ग्रामांची अर्थरचना, शेती व तदनुषंगिक उद्योग तसेच ग्रामोद्योग यांच्या साहाय्याने स्वावलंबन व स्वयंपूर्णता निर्माण होईल, अशाप्रकारे केली पाहिजे. खऱ्याखुऱ्या सहकार्याच्या तत्त्वाने ग्रामीण जीवन सर्व क्षेत्रांत, एकसंध, आदर्श बनवले पाहिजे. उद्योगाच्या माध्यमातून जरूर तेवढे चांगले शिक्षण देता येईल. 

ग्रामीणजनांनीच आत्मरक्षण करावे. पंचायतीमार्फतच न्यायाने गावांतील तंटे, वाद, भेदाभेद मिटावेत, गावांचा सारा कारभार लोकनियुक्त पंचायतीने करावा. भारताचे खरे मालक असलेल्या जनांचे योग्य राजकीय शिक्षण व्हावे. विधायक कार्यक्रमाद्वारा हे शिक्षण चांगल्या रीतीने देता येईल. एकूण ग्रामीण पुनर्रचनेसाठी वरील कार्यक्रम अंमलात आणण्यासाठी, सेवेसाठी स्वयंसेवकदल स्थापावे. या नव्या तत्त्वप्रणालीवर भारताची पुनर्घटना त्यांना अभिप्रेत होती. राज्यघटनेचा आद्य घटक जे खेडे ते, वा कार्यक्रमाने स्वावलंबी, स्वयंपूर्ण व शांतिपूर्ण बनेल असे झाल्यावर, बाह्यसत्तेची काय आवश्यकता, असे गांधीजी विचारीत. समाजसत्ता, अर्थसत्ता, राज्यसत्ता यांच्यात एकात्मभान होईल, तेथे ‘ग्रामराज्यच काय रामराज्य’ निर्माण होईल. म्हणून गावे ही केवळ राजकीयदृष्ट्या सत्ताकेंद्रे किंवा सेवाकेंद्रे न बनता, समाजकारण व अर्थकारण यातही क्रांती करणारी झाली पाहिजेत, अशी त्यांची अपेक्षा होती.

ग्रामोद्योग, ग्रामोदार, आर्थिक पुनर्रचना, खादी, मजूर-शेतकरी संघटना, जातीय ऐक्य, राष्ट्रभाषा अस्पृश्यता निवारण, व्यसनमुक्ती, दारुबंदी, सफाई, सामाजिक समता, राष्ट्रीय शिक्षण, महिलोपचार, निसर्गोपचार, सर्वोदय, कुष्ठरोगनिवारण, शासनमुक्ती इत्यादी विविधांगी, सर्वांगीण कार्यक्रम महात्माजींनी नागर व ग्रामीण जनांपुढे ठेवला, त्याच्या अंमलबजावणीची तपशीलवार योजना आखून परस्पर प्रेम, विश्वास यांच्या आधारावर तो अंमलातही आणला. त्यासाठी चरखा संघ, हरिजन सेवा संघ, चर्मालये, सरंजाम कार्यालये अशा संस्था स्थापून त्या चालवण्यासाठी कसोटीने निवडलेल्या व्यक्ती पुरवून, त्यांच्या बारीकसारीक प्रश्नांचा, समस्यांचा व संशोधनाचाही आराखडा तयार करवला.

महात्माजींनी या संस्था त्याग, कष्ट, ध्येयवाद, पावित्र्य, कठोर हिशोबपद्धती व पावित्र्याने चालाव्यात म्हणून स्वतः सभांना उपस्थित राहून वैयक्तिक मार्गदर्शन केले. कार्यसिद्धीसाठी धुळीच्या कणाइतके नम्र बनावे, साखर दुधात मिसळून जावी, तसे ते जनसामान्यांशी एकात्म बनावे व प्रेमसत्तेच्या जोरावर विधायक कार्याचे डोंगर उभारावे हे त्यांचे जीवन होते. साध्या चुकीसही ते शिक्षा करीत. कायद्याने गोष्टी लादल्यास, त्यांचे ओझे होते. महात्माजींच्या काळात, त्यांच्या लोकविलक्षण लौकिकामुळे भारत एक विशाल कुटुंब बनला. केवळ प्रार्थनांनी नव्हे तर वेष, राष्ट्र, धर्म, जात या कृत्रिम तटबंदीविरुद्धच्या बंडाने, गांधीजींनी राजकारणाचे आध्यात्मीकरण केले. थेट स्वयंपाकघरापर्यंत त्यांनी राष्ट्रप्रेम भिडविले. झाडू, लेखणी, टकळी एकाच तोलाने वापरून त्यांनी समाजातील प्रत्येक माणसासाठी कार्यक्षेत्रे निर्माण केली.

साधनशुचितेवर त्यांनी स्वतः भर दिला. वेळोवेळी प्रदीर्घ उपोषणे करून आत्मक्लेशाद्वारे, त्यांनी नेतृत्वाचा आदर्श उभा केला. प्रिय कामासाठी, स्वतः परमोच्च त्याग केला. हरिजन अलग न व्हावेत म्हणून उपोषण केले. राजसत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी कोणतेही सत्तास्थान उपलब्ध असताना, त्यापासून ते व्रतपूर्वक अलिप्त राहिले. गांधीजींचे अर्थशास्त्र, व्यक्तीची दारिद्र्यातून मुक्तता व संपत्तीसंचयापासून पराइ्मुखता या दोन बिंदूत समाविष्ट झाले आहे. द्रव्यसंचय झाल्यास तो “त्यागाय संभूतार्थानाम्” या भूमिकेवरूल केलेला असावा. संपत्तीचे निधिकारक आपण आहो, ही दृष्टी असावी, या तत्त्वावर आधारित विश्वस्त कल्पना त्यांनी मांडली. संपत्तीवानांनी जनसामान्यांहून फार वरच्या दर्जाने राहू नये, असा ते आग्रह करीत.

वर्गसमन्वयाची त्यांची दृष्टी होती. कामगार व भांडवलदार भिन्न नसावेत. परस्परांत सहकार्य, विश्वास असावा. ते दोघेही एकमेकांचे विश्वस्त राहावेत व त्यांनी दोघांनी ग्राहकांचे विश्वस्त बनावे, असे त्यांनी वेळोवेळी सांगितले व लिहिले आहे. महात्माजींची सर्वोदयाची कल्पना लोकशाहीच्या कल्पनेहून प्रगत आहे. लोकशाही जास्तीत जास्त जनांचे हित साधू पहाते; तर सर्वोदयात सर्वांच्या उदयाची, अंत्योदयाची ध्येयदृष्टी आहे.

हरएकाच्या, प्रत्येक नेत्रातील प्रत्येक अश्रू पुसणे या त्यांच्या ध्येयावरून भारतीयांचे दैन्य, दुःख व भौतिक गरजा, भवितव्याबद्दलची त्यांची तीव्र तळमळ स्पष्ट होते. ‘रामराज्य’ हे त्यांचे स्वप्न होते. प्रांत, जात, भाषा, धर्म यांच्या भेदांपासून अलिप्त, सर्वधर्मसमभाव पाळणारा, शरीरश्रम करणारा, स्त्री पुरुषांतील विषमता मान्य नसलेला, निर्मत्सरी, कर्तव्यदक्ष, स्वावलंबी, सत्याचरण, संयमी, नीतिमान, समाधानी, भयमुक्त. प्रेमरज्जूंनी बांधलेला, बंधूभाव आचरणारा समाज त्यांना निर्माण करावयाचा होता. स्वयंशासित शासनमुक्त असा समाज त्यांना निर्मावयाचा होता.

स्वराज्यात जनसामान्यांनी, सत्ताधीशांचे नियमन व नियंत्रण केले पाहिजे. मूठभर लोकांची सत्तास्थानी स्थापना, हा स्वराज्याचा हेतू नाही असे त्यांनी बजावले आहे. स्वार्थ सोडून निस्वार्थीपणे आणि धैर्याने, ढोंगबाजी सोडून प्रामाणिकपणे, ताठपणे, नीती आणि सत्य ह्या मूल्यांचा स्वीकार करून जर आपण वाटचाल सुरू केली तर या परिस्थितीत सुधारणा होण्यास उशीर लागणार नाही. गांधीजींचा हा इशारा जाणून, त्यांच्या ध्येयदृष्टीचा नवभारत स्थापण्यासाठी दृढ श्रद्धा ठेवून लगेच कामाला लागणे जरुरीचे आहे.

Tags: सेवाग्राम  हरिजन सेवा संघ खेड्याकडे चला ग्रामविकास स्वराज्य स्वदेशी जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी Sevagram Harijan Seva Sangh Rural Development Homerule Mahatma Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके