सुनील मेहता आणि अरुण जाखडे यांचे योगदान नीट समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांची सूची नजरेखालून घालायला हवी. नंतर त्यांतील लेखक आणि त्या पुस्तकांचे आशय-विषय किती विविध व सखोल आहेत हे समजून घ्यायला हवे. त्यानंतर ही पुस्तके महाराष्ट्रातील व राज्याच्या बाहेरील किती संस्था, संघटना, विद्यापीठे यांना कशी उपयुक्त ठरली याचा तपास करायला हवा. आणि मग किती प्रकारचे वाचक, लेखक, अभ्यासक, संशोधक यांना ही पुस्तके उपयुक्त ठरली यांचा शोध घ्यायला हवा. त्यानंतर त्यांनी किती विविध लेखक, अनुवादक मराठीत नव्याने आणले किंवा नावारूपाला आणले याची उजळणी करायला हवी. शेवटी किती प्रकारचे विषय, लेखनप्रकार पहिल्यांदा मराठीत आणून किंवा पुन्हा पुन्हा आणून किती नवी दालने खुली केली किंवा समृद्ध केली याचाही शोध घ्यायला हवा. अशा पद्धतीने व टप्प्याटप्प्याने फक्त तपशील उभे केले आणि त्यांची नीट जुळवणी केली तर कोणीही जाणकार माणूस थक्क होऊन जाईल. या दोन्ही प्रकाशनसंस्थांच्या वाटचालीत अनेक घटकांचा सहभाग होता, म्हणूनच इतके होऊ शकले हे खरे; पण त्यांच्या मागची दूरदृष्टी, कल्पकता व अथक मेहनत या दोघांची होती हे निर्विवाद!
गेल्या आठवड्यात मराठी ग्रंथ प्रकाशनाच्या क्षेत्रात विशेष दु:खदायक म्हणावेत असे दोन मृत्यू झाले. मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक-प्रकाशक सुनील मेहता यांचे 13 जानेवारीला निधन झाले आणि त्यानंतर तीनच दिवसांनी पद्मगंधा प्रकाशनाचे संस्थापक-संचालक अरुण जाखडे यांचे निधन झाले. त्यातील मेहता हे वयाने साठीच्या आतच होते आणि जाखडे यांनी नुकतीच पासष्टी ओलांडली होती. दोघेही इतके कार्यक्षम व कर्तृत्ववान होते की, आणखी एक-दोन दशके चांगले कार्यरत राहू शकले असते आणि त्यांच्याकडून उत्तमोत्तम अशी हजार-दोन हजार तरी पुस्तके सहज प्रकाशित होऊ शकली असती. कारण दोघेही आता पूर्ण आत्मविश्वासाने घोडदौड करीत होते, महत्त्वाचे म्हणजे राज्य व राष्ट्रीय स्तरांवरील ग्रंथव्यवहाराची नस त्यांना सापडली होती. आणखी विशेष हे की, त्या दोघांच्या वृत्ती, अभिरूची, कार्यपद्धती आणि ध्येयधोरणे यात बरीच तफावत होती; तरीही त्यांची वाटचाल परस्परांना पूरक व मराठी ग्रंथव्यवहाराला पुढे घेऊन जाणारीच होती, त्या दोघांच्या वाटचालीवर ओझरता दृष्टिक्षेप टाकला तरी हे स्पष्ट होईल.
सुनील मेहता हे 1987 पासून प्रकाशन व्यवसाय करीत होते, मात्र मेहता प्रकाशनाची स्थापना त्यांचे वडील अनिल मेहता यांनी त्याच्या दहा वर्षे आधीच केली होती. अर्थात, ग्रंथविक्रेते म्हणून कोल्हापूरात दीर्घकाळ काम केल्यानंतर अनिल मेहता यांनी प्रकाशनसंस्था सुरू केली होती आणि पहिल्या दशकात कमी पुस्तके प्रकाशित केली असली तरी मेहता प्रकाशनाची चांगली ओळख निर्माण केली होती. मात्र सुनील मेहता यांनी सूत्रे हातात घेतली आणि पुढील साडेतीन दशकांत मेहता पब्लिशिंग हाऊसला मराठी प्रकाशन व्यवसायात अव्वल स्थानावर घेऊन जाण्याइतपत मजल मारली. या काळात त्यांनी लहान-मोठी अशी साडेतीन हजार पुस्तके प्रकाशित केली. म्हणजे वर्षाला कमीत कमी शंभर आणि आठवड्यात दोन असे ते प्रमाण आहे. यात प्रामुख्याने इंग्रजीतून मराठीत आणि हिंदी, कन्नड, बंगाली इत्यादी भारतीय भाषांतून मराठीत आणलेली पुस्तके अर्ध्याहून अधिक असतील. उर्वरित पुस्तके मराठीतील नव्या-जुन्या साहित्यिकांची आहेत. दर्जेदार निर्मिती, वितरणाचे मोठे जाळे, मोठ्या जाहिराती आणि आक्रमक पद्धतीने मार्केटिंग ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये राहिली आहेत. राष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांची चरित्रे वा आत्मचरित्रे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोबेल व अन्य पुरस्कार विजेत्यांची पुस्तके धडाकेबाज पद्धतीने त्यांनी मराठीत आणली. त्याशिवाय भारतातील सुधा मूर्ती यांच्यापासून गुलजार यांच्यापर्यंतच्या अनेक लेखकांची पुस्तकेही मराठीत आणली. मराठीतील व्यंकटेश माडगूळकर ते विश्वास पाटील या दरम्यानच्या लेखकांची यादीही खूप मोठी सांगता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गजांना पुण्यात आणून वाचक-लेखक संवाद घडवणे हे काम आज तुलनेने सोपे झाले असले तरी, सुनील मेहता यांनी त्याचा प्रारंभ दोन दशकांपूर्वी केला तेव्हा त्याची अपूर्वाई खूप जास्त होती. शिवाय इ-बुक हा प्रकारही जेव्हा मराठी वाचकांना केवळ ऐकून माहीत होता आणि मराठीतील बहुतेक सर्व प्रकाशक त्याकडे उदासीनतेने किंवा तुच्छतेने पाहत होते तेव्हा, म्हणजे 2013 मध्येच सुनील मेहता यांनी त्यांची दोनेक हजार पुस्तके इ-बुक स्वरूपात आणली होती. गेल्या वर्षी कोविड काळात आठ-दहा महिने प्रकाशन व्यवहार ठप्प होता तेव्हा त्या इ-बुक्सच्या विक्रीत दोनशे ते तीनशे पटीने वाढ झाली, तेव्हा त्यांची ‘व्हिजन’ काय प्रकारची होती याचा प्रत्यय आला. मेहता यांनी देश-विदेशातील किती लेखकांशी, प्रकाशकांशी, अनुवादकांशी संपर्क-संवाद ठेवला याचा विचार केला तर आचंबित व्हावे लागते. हे सर्व करायचे तर आर्थिक व्यवहार तेवढेच चोख व प्रवाही ठेवावे लागतात आणि ती कसरत सतत करावी लागते.
अरुण जाखडे यांची प्रकाशकीय वाटचाल अगदी वेगळ्या पद्धतीने झाली. अहमदनगर जिल्ह्यातून पुणे शहरात ते आले एका कंपनीत नोकरी करण्यासाठी. शेतकरी कुटुंबातून आलेले व विज्ञानाचे पदवीधर असल्याने त्यांचा साहित्याशी थेट संबंध कमीच आला. पण वाचन-लेखनाची आवड जोपासत गेल्यावर, कंपनीतील कामगारांसोबत काही कृती-कार्यक्रम सुरू झाले आणि त्यातून पद्मगंधा दिवाळी अंक व पद्मगंधा प्रकाशन यांचा जन्म झाला. अगदीच नवख्या किंवा रूढ अर्थाने लेखक म्हणता येणार नाही अशांचे लेखन प्रकाशित करण्याचे काम त्यांनी 1988 नंतरची पाच-सात वर्षे केले. आणि त्यानंतर मात्र अभिजात साहित्य, समीक्षा, गंभीर, वैचारिक लेखन यासाठी पद्मगंधा प्रकाशन क्रमाक्रमाने लहान-मोठे प्रकल्प राबवत राहिले. त्यांनी साडेतीन दशकांच्या वाटचालीत साडेसातशे पुस्तके प्रकाशित केली. म्हणजे वर्षाला 25 आणि महिन्याला दोन असे ते प्रमाण दिसते. पण त्यांनी हाताळलेले लेखक व विषय यावर नजर टाकली आणि त्यांची एकहाती काम करण्याची शैली लक्षात घेतली तर हे प्रमाण निश्चितच कमी नाही. रा.चिं.ढेरे, गणेश देवी अशा अभ्यासक संशोधकांची लोकसाहित्य व भाषा या विषयांवरील मोठी पुस्तके काढणे आणि ती सर्वदूर पोहोचवणे हे सोपे काम नव्हते. शिवाय, र.धो.कर्वेंपासून आगाथा ख्रिस्ती यांच्यापर्यंतचे मोठे प्रकल्प मार्गी लावणे हे खूप जिकिरीचे काम होते. अनुवादाच्या क्षेत्रांतही त्यांनी काही महत्त्वपूर्ण पुस्तके आणली. पाऊलो कोएलोची ओळख पहिल्यांदा मराठीला झाली ती पद्मगंधामुळेच आणि सिमोन द बोव्हुआर यांचे ‘सेकंड सेक्स’ किंवा हिलरी क्लिंटन यांचे आत्मचरित्र ही अशी यादीही खूप मोठी आहे. अरुण जाखडे यांचे वर्तन व व्यवहार हे वरवर पाहता जुन्या पठडीतील जाणवत असे, पण आतून पाहिले तर ते बराच पुढचा विचार करीत असत हे त्यांना जवळून पाहिलेल्यांच्या लक्षात येत असे. अन्यथा दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळाव्यांना भेटी देणे आणि ग्रंथविक्री व ग्रंथनिर्मितीसाठी नवनवे प्रस्ताव पुढे आले तर त्याला उत्साहाने प्रतिसाद देणे हे त्यांना शक्य झालेच नसते.
सुनील मेहता आणि अरुण जाखडे यांचे योगदान नीट समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांची सूची नजरेखालून घालायला हवी. नंतर त्यांतील लेखक आणि त्या पुस्तकांचे आशय-विषय किती विविध व सखोल आहेत हे समजून घ्यायला हवे. त्यानंतर ही पुस्तके महाराष्ट्रातील व राज्याच्या बाहेरील किती संस्था, संघटना, विद्यापीठे यांना कशी उपयुक्त ठरली याचा तपास करायला हवा. आणि मग किती प्रकारचे वाचक, लेखक, अभ्यासक, संशोधक यांना ही पुस्तके उपयुक्त ठरली यांचा शोध घ्यायला हवा. त्यानंतर त्यांनी किती विविध लेखक, अनुवादक मराठीत नव्याने आणले किंवा नावारूपाला आणले याची उजळणी करायला हवी. शेवटी किती प्रकारचे विषय, लेखनप्रकार पहिल्यांदा मराठीत आणून किंवा पुन्हा पुन्हा आणून किती नवी दालने खुली केली किंवा समृद्ध केली याचाही शोध घ्यायला हवा. अशा पद्धतीने व टप्प्याटप्प्याने फक्त तपशील उभे केले आणि त्यांची नीट जुळवणी केली तर कोणीही जाणकार माणूस थक्क होऊन जाईल. या दोन्ही प्रकाशनसंस्थांच्या वाटचालीत अनेक घटकांचा सहभाग होता, म्हणूनच इतके होऊ शकले हे खरे; पण त्यांच्या मागची दूरदृष्टी, कल्पकता व अथक मेहनत या दोघांची होती हे निर्विवाद!
त्यामुळे त्यांचे हे काम कोणत्याही चांगल्या व मोठ्या साप्ताहिकाने, दैनिकाने, शिक्षणसंस्थेने केलेल्या कामाइतकेच किंबहुना जास्त तोलामोलाचे आहे असेच म्हणावे लागेल. मात्र तशी मान्यता किंवा प्रतिष्ठा या दोघांना आणि असे काम करणाऱ्या अन्य प्रकाशकांनाही मिळत नाही. याचे कारण ‘प्रकाशन’ व्यवहाराकडे पाहण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोन पुरेसा विकसित झालेला नाही. अनेक वेळा तर बराच सदोष असतो. याचे कारण लेखक व वाचक या दोन्ही वर्गात प्रकाशन व्यवसायाबाबत अद्याप बरेच अज्ञान, गैरसमज आहेत. किंबहुना निरक्षरता आहे असे म्हणावे लागेल. मुळात प्रकाशन चालवणे म्हणजे वाचक, लेखक, अनुवादक, संपादक, मुद्रित शोधक, चित्रकार-मुखपृष्ठकार, मुद्रक, बाईंडर, जाहिराती इत्यादी अनेक घटकांची मोट बांधावी लागते. यातील प्रत्येक घटकाच्या कमी-अधिक लहरी सांभाळणे, अव्यवस्थितपणा अनुभवणे, अनेक घटकांमध्ये सातत्याचा व परिपूर्णतेचा अभाव असणे हे सर्वच प्रकाशकांच्या वाट्याला कमी-अधिक प्रमाणात येतेच. आणि ते करताना नवनिर्मितीचा आनंद व व्यवहाराची गणिते जुळवण्याची धाकधूक अशी संमिश्र भावना सतत मनात बाळगावी लागते. कारण एवढे करूनही प्रकाशन व्यवसाय 10 ते 20 टक्के यापेक्षा अधिक परतावा देऊ शकत नाही. त्यातील काही पुस्तकेच नफा देतात, काही पुस्तके भरपूर तोटाही देतात. शिवाय प्रकाशकाने स्वत: खर्च केलेला वेळ, ऊर्जा व श्रम लक्षात घेतले तर बहुतांश वेळा तो आतबट्ट्याचाच व्यवहार असतो. त्यामुळे एका मर्यादित अर्थाने प्रकाशन व्यवहार हा शेती करण्यासारखाच प्रकार असतो. अर्थातच, जिरायती व बागायती शेतीत जेवढा फरक असतो तो इथेही असतोच. आणि म्हणून तसा विचार केला तर अरुण जाखडे हे जिरायती तर सुनील मेहता हे बागायती शेती करीत होते, असे म्हणावे लागते. पण मूलत: ते दोघेही शेतकरीच होते हे लक्षात घ्यावे लागेल.
एक चांगली गोष्ट अशी आहे की, या दोन्ही प्रकाशनसंस्था पुढील काळात अधिक भरभराटीला येऊ शकतील अशी अनुकूल परिस्थिती आहे. कारण सुनील मेहता व अरुण जाखडे यांच्या मुलांना या कामात नुसताच रस व गती आहे असे नसून, नव्या काळाशी सुसंगत राहता येईल अशी व्हिजनही आहे. त्या मुलांवर विशेषत: अखिल मेहता व अभिषेक जाखडे यांच्यावर आता दु:खाचा डोंगर कोसळलेला असणे साहजिक आहे. मात्र त्यांची इतकी पूर्वतयारी झालेली आहे की, इतका भक्कम पाया व विस्तार असलेल्या प्रकाशनसंस्था चालवताना त्यांच्या कर्तृत्वाला नवे धुमारे फुटतील. अधिक महत्त्वाचे म्हणजे त्यांना आपल्या पित्यांनी मागे ठेवलेल्या आठवणी पूर्वीचे प्रत्येक पुस्तक हाताळताना प्रेरणा देत राहतील, प्रत्येक नवे पुस्तक प्रकाशित करताना आंतरिक बळ देत राहतील. आणि त्यासाठी हजारो लेखक व लक्षावधी वाचकांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी राहतील! त्यामुळे साधनेच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सुनील मेहता व अरुण जाखडे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
हेही वाचा :
'कर्तव्यसाधना'वर प्रकाशित झालेली सुनील मेहता यांची मुलाखत:
व्यवसायात 'प्रोफेशनलिझम' आणण्याचे काम प्रकाशकांनी करायला हवे!
अरुण जाखडे यांच्या तीन मुलाखती :
1. त्यांनी लिहिलेल्या 'इर्जिक' या पुस्तकाला महाराष्ट्र फाउंडेशन ( अमेरिका ) चा अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार 2016 मध्ये मिळाला तेव्हा अरूणा ढेरे यांनी घेतलेली मुलाखत.
2. पद्मगंधा प्रकाशनाला महाराष्ट्र सरकारचा श्री. पु. भागवत पुरस्कार 2020 मध्ये मिळाला तेव्हा सुशील धसकटे यांनी घेतलेली मुलाखत.
3. दहा प्रकाशकांनी एकत्र येऊन नोव्हेंबर 2020 मध्ये, 'वाचन जागर' अभियान राबवले. तेव्हा मृदगंधा दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत.
Tags: स्मृतीलेख विनोद शिरसाठ मेहता प्रकाशन पद्मगंधा प्रकाशन अरुण जाखडे सुनील मेहता weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या