‘निळी पहाट’ आणि ‘निळी क्षितिजे’ या दोन्ही लेखसंग्रहांत काही प्रमाणात सैद्धान्तिक मूलगामी चर्चा, तर काही साहित्यकृतींची सखोल चिकित्सा रा. ग. जाधव यांनी केली आहे. त्या काळाच्या पटलावर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आणि आज ऐतिहासिक स्वरूपाची वाटते. या सगळ्या विवेचनातून रा. ग. जाधव या समीक्षकातील विचारवंत प्रगट होतो. या विचारात विवेक आहे, दूरदृष्टीही आहे. मायेच्या ओलाव्यानं हे सगळं लेखन अवतरलं असलं तरी, त्यातील सूत्रं लेखकांना अंतर्मुख करणारी आहेत. विचारप्रवृत्त करणारी आहेत. एका वाङ्मयीन जबाबदारीनं हे लेखन त्यांनी केलं आहे. हे लेखन वाचल्यावर काही लोकांवर इतिहासानंच जबाबदारी सोपवल्याचं दिसतं. ही जबाबदारी जाधव यांनी नेमकेपणानं ओळखली होती.
दि. ८ एप्रिल १९७८ रोजी ‘निळी पहाट’ या लेखसंग्रहाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. दुसरी आवृत्ती म्हणजे पुनर्मुद्रण आहे. ही दुसरी आवृत्ती अवघ्या एका वर्षात म्हणजे दि. २५ जुलै १९७९ रोजी निघाली. तिसऱ्या आवृत्तीचा कधी योग आलाच तर, त्यात नवे लेख समाविष्ट करण्याच्या मानस प्रा. रा. ग. जाधव यांनी व्यक्त केला आहे. मात्र ते नवे लेख ऑक्टोबर १९८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘निळी क्षितिजे’ या लेखसंग्रहात वाचायला मिळतात. ‘निळी पहाट’ची पुढे तिसरी आवृत्ती सप्टेंबर १९९१ मध्ये, तर चौथी आवृत्ती ऑगस्ट १९९५ मध्ये प्रसिद्ध झाली. अगदी अलीकडे म्हणजे १९ सप्टेंबर २०१२ रोजी नागपूरच्या विजय प्रकाशन यांची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. (म्हणजे एका अर्थाने ही पाचवी आवृत्ती आहे, असे म्हणायला हरकत नाही.)
हा तपशील देण्याचं कारण म्हणजे, मराठी साहित्य अभ्यासक्षेत्रात ‘निळी पहाट’चे वाचन सातत्याने होत आलेले दिसते. ‘निळी पहाट’ या लेखसंग्रहात एकूण २१ लेख आहेत. पैकी सुरुवातीचे बारा लेख वेगवेगळ्या संदर्भांतील सैद्धान्तिक चर्चा करणारे आहेत. ‘निळी क्षितिजे’ या लेखसंग्रहात एकूण सतरा लेख आहेत. पैकी सुरुवातीचे तीन लेख दलित साहित्याच्या समीक्षेचे स्वरूप आणि दलित सौंदर्यशास्त्र आकाराला येऊ शकते किंवा कसे, यासंबंधी मीमांसा करणारे आहेत. ‘निळ्या क्षितिजांचा द्रष्टा’ हा लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे द्रष्टेपण विशद करणारा असून तीन लेख डॉ. म. ना. वानखडे यांच्या संदर्भात आहेत. नागपूर येथे दि. १७-१८ जानेवारी १९७६ रोजी भरलेल्या दलित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून वानखडे यांनी जे भाषण केले, त्या भाषणाचा अन्वय लावणारा लेख, वानखडे यांच्या निधनानंतर लिहिलेला लेख, वानखडे यांचे १९८१ मध्ये ‘दलितांचे विद्रोही वाङ्मय’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले- या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना या लेखसंग्रहात समाविष्ट करण्यात आली आहे.
‘निळे पाणी’ हा रा. ग. जाधवांचा लेखसंग्रह जानेवारी १९८२ मध्ये कोल्हापूरच्या अभिजात प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. या लेखसंग्रहात दलित साहित्यविषयक मीमांसा आढळत नाही. अपवाद मात्र एका लेखाचा, तो म्हणजे बाबूराव बागुलांच्या ‘सूड’ या दीर्घ कथेवरचे ‘आदम आणि ईव्हकडे’ या शीर्षकाचे विश्लेषण. खरं म्हणजे, हे विश्लेषण आधी ‘निळी पहाट’मध्ये येऊन गेलेले आहे.
‘निळे पाणी’ या लेखसंग्रहात मराठीतील बहुचर्चित लेखकांच्या वैशिष्ट्यपूर्ण दहा कथांवर रा. ग. जाधव यांनी जे विवेचन केले आहे, त्याचा समावेश आढळतो. प्रथमदर्शनी ‘निळी पहाट’, ‘निळी क्षितिजे’ या स्वरूपाचेच ‘निळे पाणी’ हे पुस्तक असावे; असे वाटते पण तसे ते नाही. प्रस्तुत लेखात ‘निळी पहाट’ आणि ‘निळी क्षितिजे’ या दोन लेखसंग्रहांतील लेखांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
वरील दोन्ही लेखसंग्रहांतील लेखन विशिष्ट कालखंडात झालेले आहे. १९७०च्या दशकात दलित साहित्य- प्रवाहाचा झंझावात मराठी साहित्यात दाखल झाला आणि खळबळ माजली. कुतूहल आणि जिज्ञासेनं टिकाटिप्पणी सुरू झाली. ‘साहित्य कुठं दलित असतं का ? अशा आशयाची चर्चा सुरू झाली. प्रस्थापितांनी नाकं मुरडली. उलट-सुलट चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर भालचंद्र फडके, म. भि. चिटणीस, मे. पुं. रेगे, सदा कऱ्हाडे अशा दलितेतर अनेक जाणत्या अभ्यासकांनी दलित साहित्यप्रवाहाची पाठराखण केली. त्यात एक महत्त्वाचं नाव होतं- रा. ग. जाधव. त्या काळी दलित साहित्याच्या निर्मितीसंबंधी त्या सिद्धान्तासंबंधी रा. ग. जाधव यांनी वेळोवेळी जे लेखन केलं, ते या दोन लेखसंग्रहांत वाचायला मिळतं. हे लेख वेळोवेळी विविध नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. यातील लेख वाचत असताना, त्या काळी दलित साहित्य संबंधी काय वादळी वाद-विवाद सुरू असतील याची कल्पना करता येते. तथापि, रा. ग. जाधव यांनी हे लेखन अभिनिवेशाने केलेलं नाही. त्यात ना आक्रस्ताळेपणा, ना आक्रमकपणा. तसा त्यांचा स्वभावही नव्हता. मात्र या लेखातून त्यांची ठाम आणि ठोस भूमिका प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या लेखनातून चिंतन सातत्याने डोकावते. मराठी आणि इंग्रजी साहित्याचा व्यासंग प्रकट होतो. हे लेखसंग्रह म्हणजे रा. ग. जाधव यांच्या मौलिक स्वागतशीलतेचाच परिचय आहे. हे जे काही नवे अनुभवविश्व मराठी साहित्यात येते आहे, ते कमालीचे अपूर्व आणि महत्त्वाचे आहे, याची शाश्वती त्यांच्या लेखनात जाणवते. दलितांच्या या लेखनामुळेच मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावतील आणि मराठी साहित्याची एक आगळी-वेगळी ओळख निर्माण होईल, असा दुर्दम्य आतमविश्वास त्यांच्या ठायी होता, याचा प्रत्यय येतो. अत्यंत आस्थेनं, आपुलकीनं आणि कमालीच्या समंजसपणानं त्यांनी हे लेखन केलं आहे. नेमकं आणि अचूक विश्लेषण त्यांनी केलं आहे. लेखनाची प्रौढ, गंभीर आणि कमावलेली भाषा वाचकाला मोहित करते. साहित्यकृतीच्या अंतरंगात शिरताना, त्यातील सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी ते नजरेआड होऊ देत नाही. विशिष्ट सामाजिक परिप्रेक्ष्यातच दलित साहित्य- कृतीची चिकित्सा होऊ शकते, याचे भान त्यांनी ठेवलेले आहे. मिलिंद महाविद्यालयात अध्यापनाचे काम केल्यामुळे त्या महाविद्यालयात महाराष्ट्रातील शिक्षणाची परंपरा नसलेल्या वर्गातून दलित-वंचित-दुर्बल घटकांतून आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद असल्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारवैभवाचा व कार्याचा साक्षात परिचय असल्यामुळे आणि म. ना. वानखडे, म. भि. चिटणीस यांच्यासारखे समानधर्मी सहकारी लाभल्यामुळे रा. ग. जाधव यांची वैशिष्ट्यपूर्ण सम्यक् विचारदृष्टी तयार झाली होती; त्या विचारदृष्टीचा प्रत्यय या लेखनातून सातत्याने येत राहतो. या लेखनात ओतप्रोत सहजभाव असला तरी सावध चाहूलही आहे. उमलणारे नवे अंकुर जपायला हवेत अशी आस्था असली, तरी या अंकुरांची वाढ योग्य दिशेने आणि आत्मविश्वासपूर्वक व्हायला हवी, हा वडिलकीचा ध्यासही आहे. विचारांची नेमकी स्पष्टता असल्याशिवाय स्वीकृत विचारप्रणालीच्या कसाला उतरूनच अपेक्षित अभिव्यक्ती होऊ शकते, याची त्यांना जाणीव आहे. ही जाणीव दलित साहित्यप्रवाहातल्या नव्या लेखक-कवींनाही असायला हवी, असा त्यांचा आग्रह आहे.
‘निळी पहाट’ या प्रतिमेबद्दल ते लिहितात की, ‘‘ही प्रतिमा मी माझे औरंगाबादचे मित्र सी. एम. वाघ यांच्या ‘ब्लू डॉन’ नावाच्या कवितेवरून घेतली आहे. ही काही रोमॅंटिक प्रतिमा- का कुणास ठाऊक, माझ्या मनाला कायमची झपाटून गेली. निळ्या अवकाशाचा उदय आपल्याबरोबर नव्या पंचभौतिक सृष्टीचाही उदय घडवून आणतो. दलित साहित्य एक नवी सांस्कृतिक सृष्टी उभारत आहे, असे मला वाटते. या नव्या ब्रह्मांडाची चाहूल मला निळ्या पहाटेची प्रतिमा जाणवून देते.’’ नवी सांस्कृतिक सृष्टी उभारू पाहणाऱ्या दलित साहित्य- प्रवाहाकडे रा. ग. जाधव कोणत्या नजरेने-जाणिवेने पाहत होते, हे इथे लक्षात यावे. ‘निळी क्षितिजे’ या लेखसंग्रहातील मनोगतापूर्वी रा. ग. जाधव यांनी प्रारंभीच प्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘नागझिरा’ या पुस्तकातील पुढील ओळी उद्धृत केल्या आहेत. ‘‘समोरच्या हिरवळीवर नाना कीटक होते. खरपुडे होते, टोळ होते, गवळणी होत्या, चतुर होते, नाकतोडे होते, पतंग होते, फुलपाखरे होती. हे कीटक टिपण्यासाठी नाना पाखरे येत. एक नीळकंठ पाखराचे जोडपे येई. हे निळेगर्द पाखरू पंख पसरून अधांतरी झेप घेई; तेव्हा माझ्या मनात येई की, स्वातंत्र्य ह्या वस्तूचा रंग बहुधा निळा असावा...’’ मुक्तपणे आणि मूल्याधारित अभिव्यक्तीतून प्रकटणाऱ्या साहित्याचा परामर्श घेणाऱ्या लेखसंग्रहाचे शीर्षक ‘निळी क्षितिजे’ असावे, असं रा. ग. जाधव यांना का वाटलं असावं त्याचं सूचक स्पष्टीकरण वरील उताऱ्यावरून लक्षात येतं.
‘‘दलित साहित्याच्या वाचनातून आणि चर्चेतून वेळोवेळी जे प्रश्न मनाला तीव्रतेने जाणवत गेले, ते-ते प्रश्न नीटपणे समजावून देण्या-घेण्यासाठी हे लेखन केलेले आहे.... दलित साहित्य, ते निर्माण करणारे सर्जनशील मन आणि त्याचा अंतर्बाह्य परिसर यांच्यात प्रकटपणे वा प्रच्छन्नपणे जाणवलेली प्रयोजन-प्रेरणांची, वृत्तीप्रवृत्तींची, अडचणी-अडथळ्यांची, सिद्धी-साधनांची जी-जी वैशिष्ट्ये आहेत त्यांचा शोधबोध करून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. दलित साहित्याचा सहप्रवासी बनून केलेला हा सुखसंवाद आहे. त्याचा न्यायाधीश होऊन दिलेला निर्वाळा नव्हे’’ असे त्यांनी ‘निळी पहाट’ या लेखसंग्रहाच्या मनोगतात म्हटले आहे. या लेखनामागील रा. ग. जाधव यांचे प्रयोजन पारदर्शी आणि ऋजुता व्यक्त करणारे आहे.
दलित साहित्याच्या इतिहासातील एक आद्यचर्चा डॉ. म. ना. वानखडे यांच्या प्रेरणेने १९ व २४ नोव्हेंबर १९६७ रोजी आयोजित करण्यात आली होती. ती ‘अस्मिता’ मासिकाच्या पहिल्या अंकात अंतर्भूत करण्यात आली होती. या आद्यचर्चेचा प्रस्ताव करण्याचे काम रा. ग. जाधव यांनी केले होते. ‘हे माझे महद्भाग्य होते’ असे त्यांनी म्हटले आहे. या चर्चेत दलित साहित्यविषयक अनेक प्रश्न स्पष्टपणे व सूचकपणे व्यक्त झाले होते. या चर्चेत डॉ. म. ना. वानखडे, प्रा. मे. पुं. रेगे, प्राचार्य म. भि. चिटणीस प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी भाग घेतला होता. ‘निळी पहाट’मध्ये ही आद्यचर्चा वाचायला मिळते.
दलितांची सांस्कृतिक चळवळ आणि वाङ्मयीन चळवळ यांच्या सर्वंकष व्याप्तीचा एक स्थूल नकाशाच या चर्चेतून पुढे येताना दिसतो. आजही ही चर्चा वाचताना अनेक संदर्भ महत्त्वाचे ठरतात.
दलित साहित्य :
सांस्कृतिक यथादर्शनाची चर्चा करताना निग्रो समाजाचा आणि साहित्याचा अभ्यास करण्यापेक्षा बुद्धजीवनाचा व पाली साहित्याचा अभ्यास अधिक प्रेरक आहे, असे आवर्जून सांगणाऱ्या एकनिष्ठ दलित विचारवंतांची दलित साहित्याला व समाजाला अधिक गरज आहे, असे रा. ग. जाधव यांचे प्रतिपादन आहे. भारतीय सामाजिक परिप्रेक्ष्यातच आपल्या कलासंस्कृतीचे आकलन शक्य आहे, हे सुचवणारे हे प्रतिप्रश्न आहे. दलित लेखकांनी आपली वाटचाल करताना कोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला हव्यात, याचे संसूचन रा. ग. जाधव यांनी स्पष्टपणे केले आहे. आत्मीय संबंधाशिवाय हे शक्य नाही. समोरच्याला अप्रिय वाटले तरी प्राप्त परिस्थितीत हे सांगणं किती गरजेचं आहे, याची जाणीव त्यांना होती. ‘‘दलितेतरांची शाबासकी किंवा मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणे व तो प्रयत्न अयशस्वी झाल्यास हेत्वारोप करीत सुटणे किंवा तो प्रयत्न यशस्वी झाल्यास स्वत:स धन्य समजणे- या सर्वच प्रकारापासून आज-उद्याच्या दलित साहित्यिकाने दूर राहावे असे वाटते.’’ दलित साहित्य चळवळीच्या प्रारंभकाळी रा. ग. जाधव यांनी सांगितलेले धोके संभवत होते. तथापि, अद्यापही हे धोके संभवणार नाहीत, अशी परिस्थिती नाही. साधारणत: चाळीस वर्षांपूर्वी एका समीक्षकाने ‘आपल्या’ लेखकांना दिलेला हा इशारा अजूनही कालबाह्य झालेला नाही, यातच त्यांचे मोल दडले आहे. विद्रोहाची भूमिका घेणाऱ्या साहित्यात सामाजिक परिवर्तनाची आस असते. जे विद्रोह करतात, त्यांच्या जागृतीने व आंदोलनामुळे सामाजिक परिवर्तनाची परिपूर्ती होणार नाही; तर ज्यांच्याविरोधात विद्रोह पुकारला जातो, त्यांच्यातही जागृती व आंदोलनं होणं गरजेचं आहे. दोन्ही वर्गातील आपापसातील संघर्ष दोन्ही वर्गांसाठी हिताचा ठरणारा नाही. परस्परांच्या योग्य समन्वयातूनच एकात्म उद्दिष्ट साध्य करता येईल. असा रा. ग. जाधव यांचा दृष्टिकोन आहे. हा समतोल आणि हितकारी दृष्टिकोन अंतिमत: आपल्या समाजाचे हित पाहणारा आहे. व्यापक समाजाप्रति असणारी सखोल आत्मीयता त्यात दिसून येते. विद्रोही साहित्य कोणासाठी अवतरते, या प्रश्नाचा शोध घेताना वरील दृष्टिकोन त्यांनी मांडला आहे.
दलित कलेच्या आकृतिबंधाची चर्चा तुलनेने कमी झालेली आढळते. भ.मा.परसवाळे, प्रकाश कामतीकर, श्रीधर अंभोरे, भाऊ समर्थ, हेमंत नागदिवे, नामदेव ढसाळ यांनी काढलेल्या रेखाचित्रांची चर्चा ‘अस्मितादर्श’सारख्या नियतकालिकातून झालेली असली, तरी तिचे प्रमाण कमीच आहे. वरील प्रतिभावंत चित्रकारांनी त्या काळात (आणि आजही) अस्मितादर्श, निकाय, प्रमेय, अस्तित्व अशा नियतकालिकांची सुरेख पण अर्थपूर्ण मुखपृष्ठे केलेली आढळतात. वरील अंकांमधून त्यांची रेखाचित्रे झळकलेलीही आहेत. शेकडो कवी-लेखकांच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ आणि आतील आशयाच्या अनुषंगाने रेखाचित्रे या कलावंतांनी काढलेली आहेत. या रेखाचित्रांच्या सौंदर्याची, त्यातून प्रकटणाऱ्या आशयाची चर्चा रा. ग. जाधव यांनी तपशिलाने केली आहे. या कलानिर्मितीतून दलित सौंदर्याचे कसे वेगळे असलेला आकृतिबंध रूपास येत असून या आकृतिबंधाचा स्रोत दलित जीवनातच असल्याचे म्हटले आहे. दलित आकृतिबंधाची महात्मता अखेर दलित जीवनमूल्यांच्याच आधारे निश्चित करावी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
दलित साहित्यातील भाषावैशिष्ट्यांचा परामर्श घेताना रा. ग. जाधव यांनी ‘दलित शब्दब्रह्म’ हा शब्दप्रयोग योजला आहे. नामदेव ढसाळ, वामन निंबाळकर, त्र्यंबक सपकाळे, अर्जुन डांगळे आदी कवींच्या काव्यातील शब्दकळा, त्यामागील सांस्कृतिक विश्व, या विश्वाची स्वायत्तता, शब्दयोजनेमागील तीव्र भावना, उत्कट जाणिव याविषयी त्यांनी चर्चा केली आहे. या संदर्भात ते म्हणतात, ‘‘दलित समाजाला स्वतंत्र असल्याचे भान ज्या वेळी आले, त्याच वेळी त्याला स्वतंत्र भाषेचे सामर्थ्यही प्राप्त झाले. शब्द व स्वातंत्र्य हे दोन्ही नेहमीच हातात हात घालून वाटचाल करत असतात. दलित समाज युगानुयुगे पारतंत्र्यात खितपत होता, म्हणून त्याला भाषेचे स्वातंत्र्यही लाभले नाही.’’ ‘स्वातंत्र्य’ हे मूल्य आपापल्या भाषेतून सहजपणे अभिव्यक्त होताना आपली भाषेची मौलिकता (ओरिजिनॅलिटी) अबाधित ठेवत असते. ही भाषेची मौलिकता कवितेला अर्थवत्ता प्राप्त करून देत असते. ‘‘या दलित शब्दब्रह्माचे उद्गाता महापुरुष निर्विवादपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. दलित मनात स्वातंत्र्याची, स्वत्वाची, अस्मितेची ज्योत त्यांनीच पाजळली’’ असा सर्व मान्य निष्कर्ष रा. ग. जाधव काढतात.
दलित साहित्यिकाला सामाजिक चळवळींचा आधार घेणं क्रमप्राप्त आहे. आपल्या भूमिका अविचल ठेवण्यासाठी आणि वर्तमानकालीन प्रश्नांची जाणीव होण्यासाठी त्याला हे गरजेचं आहे, या वास्तवावर रा. ग. जाधव यांनी नेमकेपणानं बोट ठेवलं आहे. सांस्कृतिक चळवळीचा आश्रय घेतल्याने या साहित्यिकाला केवळ शोभाच येते असे नव्हे; तर त्यांना आंतरिक आधार व पुष्टीही त्यामुळे प्राप्त होते, असं त्यांचं सांगणं आहे. बाबासाहेबांच्या बुद्धप्रणीत मानवतावादाने या साहित्यकारांनी हा शोभादायी आश्रय उपलब्ध करून दिला, असं त्यांचं निरीक्षण आहे. ‘संतसाहित्य आणि दलित साहित्य’, ‘दलित पुराणकथा’ असे दोन लेख या संग्रहात आहे. विषयाच्या अनुषंगाने जाधव यांनी जे प्रतिपादन केले आहे, त्याची चर्चा पुढे झालेली दिसत नाही. ही चर्चा कोणत्या दिशेनं जावी त्याच्या शक्यता त्यांनी सूचित केल्या होत्या. पुढे त्यांनीही या विषयावर फारसे मंथन केल्याचे आढळत नाही. या अर्थाने हे विषय पुढे जाऊ शकले नाहीत. असेच म्हणायला हवे.
दुसऱ्या टप्प्यावरील दलित समीक्षेचे काय दृश्य आहे, याचा ऊहापोह जाधव यांनी केलेला दिसतो. ही समीक्षा कोणत्या अंगाने पुढे जायला हवी, त्याची मांडणी त्यांनी केलेली आहे. तथापि, पुढील काळात ही समीक्षा पुढे गेल्याचे दिसते. त्यांना अभिप्रेत असलेली समीक्षामूल्यं पुढे विकसित झालेली दिसतात. पण जाधव यांनी त्या काळात हे कर्तव्यबुद्धीनं सूचित केलेलं होतं, ते नाकारता येत नाही. दलित अभिजनवादाची गरजही त्यांनी बोलून दाखवली होती. पण नंतरच्या कालक्रमात दलित अभिजनवर्गाने कला आणि संस्कृतीला जो आश्रय द्यायला हवा अशी अपेक्षा त्यांनी केली होती, ती नंतर दृष्टिपथात आली. दलित अभिजनवर्गाने दलित साहित्याची, त्यातील गुण-दोषाची, त्यातील इष्टनिष्ट प्रवृत्तीची दखल घेण्यासंबंधीची त्यांची अपेक्षा या अर्थाने पूर्ण झालेली दिसते.
अण्णा भाऊ साठे यांच्या कथासृष्टीचा मागोवा रा. ग. जाधव यांनी तटस्थपणे घेतलेला आहे. अण्णा भाऊंना लेखक म्हणून श्रेय उशिरा मिळाले, याबद्दल ते म्हणतात, ‘‘सांस्कृतिक परंपराच ज्यांना नाकारण्यात आली, त्यांना कलासाहित्याची परंपरा कोण बहाल करणार?’’ अण्णा भाऊंनी जी साहित्यनिर्मिती केली, त्याचे श्रेय त्यांनी स्वीकारलेल्या मार्क्सवादी विचारधारेला दिले आहे. अण्णा भाऊंना मार्क्सवादाचा टॉर्च सापडला नसता, तर त्यांच्यातील कलावंत कदाचित जन्मालाही आला नसता, असं रा. ग. जाधव लिहून जातात. अण्णा भाऊंचा गौरव करताना ते म्हणतात,‘‘एका दृष्टीने पाहता, अण्णा भाऊंचे कथासाहित्य म्हणजे त्यांचे आत्मचरित्रच आहे. कारण त्यांचे आत्मचरित्र व त्यांनी आपल्या मानलेल्या समाजाचे चरित्र एकरूपच आहे. त्यांनी दलित समाजाला नायक दिले, नायिका दिल्या, सद्गुण दिले, शौर्य दिले, त्याग व माणुसकीचे आदर्श दिले आणि हे सर्व दलित समाजातूनच दिले.’’
बाबूराव बागुलांच्या ‘सूड’ या दीर्घकथेचे रा. ग. जाधव यांनी विश्लेषण वाचण्यासारखे आहे. एखाद्या कथेच्या अंतरंगात शिरून त्या कथेचे पापुद्रे हलके-हलके कसे उलगडावेत, त्याचे उदाहरण म्हणून या विश्लेषणाकडे पाहता येईल. कथेतील व्यक्तिरेखांचे संदर्भ, त्यांच्या जीवनजाणीवा, आत्मगत संघर्षाचे स्वरूप, मानसिक संघर्ष आणि ताणतणावातून निर्माण झालेली विवक्षित परिस्थिती रा. ग. जाधव यांनी फार तरलपणे टिपली आहे. स्वामी आणि ज्वाला (जानकी) यांच्यातील परस्परविरोधी भूमिका भावबंधात परावर्तित होण्याची प्रक्रिया कशी नैसर्गिकपणे पार पाडतात आणि ते जणू काही आदम व ईव्हच्या स्वरूपातच वाचकासमोर उभे ठाकतात. रा. ग. जाधव यांनी हे विश्लेषण अतिशय तन्मयतेने केले आहे. ते मुळातून वाचावं असं आहे.
दलित साहित्यप्रवाहातील विविध नियतकालिकांत अनेक नवोदित लेखक १९७०च्या दशकात कथा लिहीत होते. या नियतकालिकांतून प्रसिद्ध होणाऱ्या कथा वाचून ‘नवोदित दलित कथा’ असा लेख जाधव यांनी लिहिला आहे; परंतु ज्या कथाकारांचा परामर्श त्यांनी घेतला, त्यांतील फार थोडे कथाकार पुढच्या काळात लिहीत राहिले. त्यापैकी योगिराज वाघमारे, वामन होवाळ, योगेंद्र मेश्राम, अमिताभ ही नावं कथाक्षेत्रात स्थिरावली. अरुण कांबळे पुढे कवी म्हणून ओळखले जाऊ लागले. ताराचंद्र खांडेकरांनी वैचारिक लेखन केले. भीमराव शिरवाळे पुढे कालवश झाले. पुंडलिक घोंगडे, गोपाळ रेडगावकर, अनंत भोयर यांच्या कथालेखनात फारसे सातत्य राहिले नाही. दलित कुटुंबकथेचे रूप दलित कथा आकार घेत आहे, या वैशिष्ट्याकडे जाधव यांनी लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे दलित कवीदेखील आपल्या कवितेत कुटुंबाचे चित्रण करीत आहेत आणि हे या कवितेचे वेगळेपण आहे, असे त्यांनी ‘दलित कुटुंबकाव्य’ या लेखात नोंदवले आहे. या संदर्भात त्यांनी अर्जुन डांगळे, ज. वि. पवार, दया पवार, वामन निंबाळकरांच्या कवितांचा परामर्श घेतला आहे. या कवींनी विशेषत: आईचे चित्रण ज्या उत्कटतेने केले आहे, त्याचा संदर्भ घेऊन त्यांनी चर्चा केली आहे.
पुढील काळात दलित कवयित्रींचा आविष्कार कसा असेल, हे पाहण्याची त्यांना फार फार उत्सुकता होती. तशी नोंद त्यांनी या लेखात करून ठेवली आहे. खूप कवयित्री पुढे येतील आणि आत्माविष्कार करू लागतील, असे त्यांना वाटत होते. या संदर्भात आज विचार केला, तर महाराष्ट्रात जवळपास पन्नास कवयित्री कविता लिहिताहेत. दया पवार (बलुतं), केशव मेश्राम (उत्खनन), यशवंत मनोहर (उत्थानगुंफा), नामेदव ढसाळ (गोलपिठा), बाबूराव बागुल (सूड), वामन निंबाळकर (गावकुसाबाहेरील कविता), अर्जुन डांगळे (छावणी हलते आहे), प्र. ई. सोनकांबळे (आठवणींचे पक्षी), सुधाकर गायकवाड (शूद्र). सत्तरीच्या दशकातील लक्ष वेधून घेणारे दलित साहित्यिक, त्यांच्या साहित्यकृतींची जाणीवपूर्वक दखल जाधव यांनी घेतली आहे आणि त्या कवी-लेखकाच्या अभिव्यक्तीतील सौंदर्यस्थळे, भाषाविशेष, त्यांचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. वरील लेखकांना प्रा. रा. ग. जाधव यांच्यासारखे समीक्षक लाभले, ही गोष्ट त्यांचे लेखनबळ वाढवणारी ठरली.
‘निळी क्षितिजे’ या लेखसंग्रहाचा धावता उल्लेख या लेखांच्या प्रारंभी केला आहे. यातील सुरुवातीच्या तीन लेखांत तात्त्विक आणि सैद्धान्तिक भूमिकेचा विचारव्यूह मांडण्याचा प्रयत्न रा. ग. जाधव यांनी केला आहे. ‘‘दलित साहित्याच्या निळ्या पहाटेनंतर दलित सृजनशील मनाने स्वत्वशोधनाच्या प्रेरणेने भूतकाळाच्या अथांग निळाईत झेप घेणे स्वाभाविकच होते. दलित सांस्कृतिक अभिव्यक्तीचा हा नैसर्गिक टप्पा होता’’ असे नमूद करून, ‘पोखरण’, ‘शूद्र’ यांसारख्या कादंबऱ्यांतील भूतकाळाचे चित्रण हा वस्तुनिष्ठ वृत्तीचाच स्वत्वशोधनाचा प्रयत्न आहे,’ असा हवाला दिला आहे. गंगाधर पानतावणे, भालचंद्र फडके, शंकरराव खरात, यशवंत मनोहर, केशव मेश्राम, रा. ग. जाधव, अर्जुन डांगळे, म. सु. पाटील यांसारख्या लेखकांनी दलित साहित्यविचारांची विविध अंगे आपापल्या ग्रंथांतून विशद केलेली आहेत, त्याचा नामनिर्देश जाधव यांनी केला आहे आणि तो ऐतिहासिक सत्याला व संदर्भाला धरून आहे. त्याबरोबर त्यांनी एक वाङ्मयीन सत्य स्पष्टपणे नोंदवले आहे. ते म्हणजे, ‘‘आधी साहित्य आणि नंतर समीक्षा असा जो क्रम सामान्यपणे कोणत्याही साहित्यसंप्रदायात आढळतो, तो दलित साहित्याच्या संप्रदायात आढळला नाही. साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात प्रथम मोठ्या स्वरूपात दलित साहित्यविचार पुढे आला, नंतर दलित साहित्यनिर्मिती झाली.... पण एवढे नाही, साहित्यपूर्व दलित समीक्षेतील काही विचार पुनरपि तपासण्याची व संस्कारण्याची गरजही नंतरच्या दलित साहित्यनिर्मितीने निर्माण केली.’’
साहित्यक्षेत्रात जी गोष्ट अभावानेच घडते आणि ती दुर्मिळ असते, अशा एका घटितासंबंधी रा. ग. जाधव यांनी भाष्य केले आहे. दलित साहित्यप्रवाहाशी ते किती आतून बाहेरून एकरूप झाले होते, हे निदर्शक आहे. ‘‘या सगळ्या गोष्टींमुळे समीक्षा व समीक्षक यांच्या व्याख्याच काहीशा बदलून टाकण्याची गरज दलित साहित्याने निर्माण केली’’ अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी जाता-जाता केली आहे.’’ दलित साहित्याच्या वेगळ्या सौंदर्यशास्त्राची चर्चा अभ्यासक अधून-मधून करताना दिसतात. रा. ग. जाधव यांनीही प्रारंभकाळात या चर्चेला तोंड फोडल्याचे दिसते. त्यांच्या मते, त्या काळी मर्यादित अर्थाने का होईना दलित साहित्याचे वेगळे सौंदर्यशास्त्र संभवते, असे त्यांनी म्हटले आहे आणि त्या अनुषंगाने ‘निळ्या सौंदर्याची चाहूल’ या लेखात मतप्रतिपादन केले आहे. ‘बलुतं’ या बहुचर्चित आत्मकथनाविषयी समीक्षकांनी हिरीरीने चर्चा केल्याचे आढळते. जाधव यांनीही ‘बलुतं’संबंधी समीक्षा केलेली आहे. त्यांच्या मते, ‘बलुतं’मध्ये दया पवारांधील कवी दिसत नाही. दिसलाच, तर तो अंग चोरून बसलेला दिसतो. मात्र त्यांच्यातील विचारवंत या ठिकाणी प्रत्ययास येतो. पुढची नोंद मात्र नंतरच्या काळात खरी ठरलेली दिसते. ‘‘मराठी साहित्याच्या पांढरपेशा इतिहासात जे आजवर कधीच घडले नाही वा घडणे शक्य नव्हते, ते दलित साहित्यात यापुढे घडेल व आत्ताही घडत आहे. ‘बलुतं’ने हे सिद्ध केले आहे.’’ पुढच्या काळात जी आत्मकथनं मोठ्या प्रमाणात आली, त्यांचं असं भाकित जाधव यांनी वर्तवलं होतं.
‘उपरा’ या आत्मकथानाबद्दलही त्यांनी भाष्य केलेलं आहे. ‘‘सामाजिक आणि वैचारिक अशा दुहेरी अर्थाने ‘उपऱ्या’ ठरलेल्या एका संवेदनशीलतेचा हा आत्माविष्कार विलक्षण परिणामकारक आहे,’’ असं त्यांनी म्हटलं आहे. डॉ. म. न. वानखडे यांनी नागपूरच्या दलित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना, काही सूत्रं मांडली होती. ‘मराठी साहित्य कृत्रिम, परपुष्ट, संकुचित आहे व ही कोंडी दलित साहित्य फोडू शकेल’ असा आशावाद वानखडे यांनी व्यक्त केला होता. या भाषणाचा अन्वय लावताना जाधव यांनी या आशावादाची दखल घेतली आहे. डॉ.वानखडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आलेख वानखडे गेल्यानंतर लिहिलेल्या स्मृतिलेखात आढळतो. वानखडे यांना अभिजात व्यक्ती म्हणून त्यांनी गौरवले आहे. वानखडे यांच्या ‘दलितांचे विद्रोही वाङ्मय’ या ग्रंथाला प्रस्तावना लिहिताना जाधव यांनी वानखडे यांच्या लेखनातील क्रांतिदर्शत्व अधोरेखित केले आहे. वानखडे यांनी बुद्धिवादाच्या जास्तीत जास्त दृढपथावर दलित साहित्याची विचार चौकट उभी करण्याचा जो यशस्वी प्रयत्न केला होता, त्यासंबंधी जाधव यांनी समरसून विवेचन केल्याचे आढळते.
येत्या काळात दलित नाटक कसे असेल, कसे असावे, यासंबंधी काही आडाखे ‘दलित नाट्यप्रतिभा’ या लेखात वाचायला मिळतात. म. भि. चिटणीस यांनी ‘युगयात्रा’ हे नाटक १९५५ मध्ये लिहिले आणि त्याचा प्रयोग धर्मांतरांच्या दिवशी दि, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत झाला. हे नाटक आणि दलित कविता रा. ग. जाधव यांच्यासमोर आहेत. दलित कवितेचं स्वगतासारखं प्रकटणं त्यांना महत्त्वाचं वाटतं आणि म्हणून दलित कविता व नाटक यांचा काही अनुबंध ते जोडू पाहतात. सत्तरीच्या दशकात अनेक दलित लेखकांनी पुस्तपत्रे (पॅम्प्लेट्स) प्रकाशित केलेली दिसतात. या पुस्तपत्रांचे मोल जाधव यांच्या लक्षात आले होते. अशी पुस्तपत्रांची प्रकाशने एक प्रकारच्या वैचारिक निष्ठेने अवतरतात, अशी त्यांची धारणा आहे आणि ती बरोबरच आहे. तीव्र विचारसंघर्षाच्या काळातच अशी पुस्तपत्रे प्रकाशित होतात. त्यातून सांस्कृतिक परिवर्तनाची आच दिसून येते आणि अशी गरज दलित विचारवंतांनाच जाणवते, असे त्यांचे निरीक्षण आहे.
‘निळी पहाट’ आणि ‘निळी क्षितिजे’ या दोन्ही लेखसंग्रहांत काही प्रमाणात सैद्धान्तिक मूलगामी चर्चा, तर काही साहित्यकृतींची सखोल चिकित्सा रा. ग. जाधव यांनी केली आहे. त्या काळाच्या पटलावर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आणि आज ऐतिहासिक स्वरूपाची वाटते. या सगळ्या विवेचनातून रा. ग. जाधव या समीक्षकातील विचारवंत प्रगट होतो. या विचारात विवेक आहे, दूरदृष्टीही आहे. मायेच्या ओलाव्यानं हे सगळं लेखन अवतरलं असलं तरी, त्यातील सूत्रं लेखकांना अंतर्मुख करणारी आहेत. विचारप्रवृत्त करणारी आहेत. एका वाङ्मयीन जबाबदारीनं हे लेखन त्यांनी केलं आहे. हे लेखन वाचल्यावर काही लोकांवर इतिहासानंच जबाबदारी सोपवल्याचं दिसतं. ही जबाबदारी जाधव यांनी नेमकेपणानं ओळखली होती. त्यांनी तसं नमूदही केलं आहे. ‘निळी पहाट’ या लेखसंग्रहाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटलं आहे, ‘‘एखाद्या अपूर्व सांस्कृतिक देखाव्याची- फिनॉननची- पहाटप्रभा पाहण्याचे भाग्य इतिहासाची नियती काही जणांच्या भाळावर लिहून जाते. मराठी दलित साहित्याचा अवतार असाच एक अपूर्व सांस्कृतिक देखावा आहे. त्याचा साक्षी होण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला विशेष आनंद वाटतो.’’
रा. ग. जाधव यांनी केलेल्या या कामाबद्दल दलित साहित्यचळवळीतील प्रत्येक लेखक-कवीच्या मनात कृतज्ञता आहे. या कृतज्ञतेची नोंद करून रा. ग. जाधव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना आदरांजली वाहतो.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ मराठी साहित्य समीक्षक रा. ग. जाधव यांचे २७ मे २०१६ रोजी निधन झाले. त्या आधी १२ वर्षे ते साधना ट्रस्टचे विश्वस्त होते. त्या बारा वर्षांत त्यांचे व साधनाचे ऋणानुबंध कशा प्रकारचे होते, हे मराठी साहित्यजगताला माहीत आहे. म्हणूनच, त्यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून रा. ग. जाधव स्मृतिव्याख्यान २५ मे २०१७ रोजी मसापच्या सहयोगाने आयोजित केले आहे. या अंकात जाधव सरांच्या दोन महत्त्वाच्या पुस्तकांवर विस्तृत लेख आहे आणि याच महिन्यात त्यांच्या ‘निळे पाणी’ या दुर्मिळ पुस्तकाची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून येत आहे. -संपादक
Tags: निळी क्षितिजे निळी पहाट रा.ग.जाधव मनोहर जाधव nili kshitije Nili pahat R.G.jadhav manohar jadhav weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या