फुले-आंबेडकरांच्या परिवर्तनाच्या विचारांशी बांधिलकी मानून तो लेखन करत होता. माणसाचं माणूसपण त्याला श्रेष्ठ वाटत होतं. नव्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ तो आवर्जून आयोजित करीत असे. मान्यवरांसह मित्रांच्या गोतावळ्यात रमत असे. सगळ्यांशी सलोख्याचे संबंध राहावेत, यासाठी त्याच्या बाजूने पुढाकार घेत असे. फुले-आंबेडकरांचा अनुयायी असल्यामुळे तो कधी कर्मकांड करीत नसे. उपास-तापास, मुहूर्त, पूजापाठ हे त्याच्या खिजगणतीत नव्हतं. त्यामुळंच त्यानं ऐन अमावास्येच्या दिवशी दुपारी बारा वाजता स्वतःचं लग्न केलं होतं. त्यामुळे त्याच्याशी माझे सूर चांगले जुळत असत.
रामनाथ चव्हाणांचे ‘भटक्या विमुक्तांचे अंतरंग’ हे पुस्तक १९९०मध्ये केव्हा तरी हातात पडलं. पुस्तकाचा विषय महत्त्वाचा होता. पुस्तक आवडल्यामुळे त्यावर नागपूरच्या दैनिक ‘लोकमत’च्या रविवार पुरवणीत दीर्घ परीक्षण लिहिलं. सवयीनुसार ते कात्रण लेखकाला पाठवून दिलं. त्यांचं सुरेख अक्षरातील मजकूर असलेलं पोस्ट कार्ड दहा-बारा दिवसांनी आलं. रामनाथ चव्हाणांशी माझा परिचय असा झाला. त्या वेळी मी फैजपूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक होतो.
मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात यू.जी.सी.ची पाठ्यवृत्ती घेऊन संशोधनासाठी १९९५मध्ये रुजू झालो आणि त्यानंतर रामनाथ चव्हाणांच्या प्रसंगपरत्वे भेटीगाठी होऊ लागल्या. त्याचदरम्यान पुण्यात मुस्लिम मराठी साहित्य संमेलन भरले होते. प्रा.फकरुद्दीन बेन्नूर त्याचे अध्यक्ष होते. या संमेलनात त्यांची भेट झाली होती. पुढे सातत्याने भेटी होत राहिल्या. मैत्री झाली. काही माणसं इतकी भावतात की, पहिल्या भेटीमधून औपचारिकपणा नकळत गळून पडतो. आम्ही एकमेकांना एकेरी नावानं संबोधू लागलो. हे कसं झालं, ते दोघांनाही उमजलं नाही; पण मैत्रीपूर्ण संबंध वाढत गेले.
रामनाथनं अनेक दैनिकांत सदरं लिहिली. सदरं लिहिण्याची त्याला आवड होती. एक विशिष्ट सूत्र घेऊन तो सदरं लिहायचा. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील महिलांचे प्रश्न त्याने ‘वेदनेच्या वाटेवरून’ या सदरामध्ये मांडले. निराश्रित, रस्त्यावर पोटापाण्यासाठी भटकणाऱ्या मुलांवर त्यानं ‘घाणेरीची फुलं’ लिहिली. दखलपात्र नसलेल्या लोकांवर त्यानं ‘बिनचेहऱ्याची माणसं’ अशी मालिका लिहिली. या सदरांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पुढे ती पुस्तकरूपानं प्रकाशित झाली. विजय कुवळेकर यांसारख्या संपादकानं त्याचा हात लिहिता ठेवला.
रामनाथनं वेगवेगळे वाङ्मयप्रकार हाताळले. ‘बामनवाडा’, ‘साक्षीपुरम’ यांसारखी नाटकं चर्चेत राहिली. कथा-कादंबरीमधून त्यानं उपेक्षितांचे प्रश्न मांडले. अधून-मधून कविताही तो लिहीत असे, पण तो त्या प्रसिद्धीला देत नव्हता. कवितासंग्रह होईल इतपत त्याच्या फाईलमध्ये कविता असतील. मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्ताने आम्ही दर वर्षी मराठी विभागाच्या वतीनं विद्यापीठात राज्यस्तरीय कवीसंमेलन घेतो. एका वर्षी रामनाथ या कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून आल्याचं मला स्मरतं. त्या वेळी रामनाथ कवितादेखील लिहितो, हे अनेकांना ज्ञात झालं.
रामनाथ स्वभावानं संयमी आणि विनयशील होता. आपले मुद्दे तो शांतपणे पण ठामपणे मांडत असे. व्याख्यान असो वा चर्चासत्र विषयाची मांडणी तो तयारीनं करीत असे. वक्तृत्वकला त्याला लाभली होती. विद्यापीठात दर वर्षी प्राध्यापकांसाठी रिफे्रशर कोर्सेस आयोजित केले जात. या कोर्सेसमध्ये रामनाथनं त्याच्या अभ्यासविषयाची मांडणी अनेकदा केली होती. ‘कमवा आणि शिका’ या योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसमोर तो व्याख्यानं देत असे. दारिद्र्य आणि परिश्रम याचा त्याला अनुभव असल्यामुळे त्याच्या व्याख्यानात सामाजिक प्रश्नांसंबंधी नैसर्गिक मांडणी येत असे. मुलं अंतर्मुख होत असत. मराठी विभागात विद्यार्थ्यांसमोर बोलण्यासाठी आम्ही त्याला आवर्जून बोलावत असू. त्याच्या व्याख्यानाला मुलं गर्दी करत असत. चित्रकलेतही रामनाथला गती होती. अगदी सुरुवातीच्या काळात त्याला पोटासाठी संघर्ष करावा लागला, त्या वेळी तो रस्त्यावर चित्र काढत असे. रसिकांनी दिलेल्या पैशांवर कशी-बशी गुजराण तो करीत असे. डेक्कन सिनेमामध्ये त्यानं डोअरकीपरचंही काम केलं होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील रस्त्यांच्या कामावरही त्यानं मजूर म्हणून काम केलं आहे. पुढे याच विद्यापीठात त्याला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचं प्रमुखपद मिळालं. या पदासाठी लागणारी योग्यता आणि पात्रता त्यानं परिश्रमानं मिळवली होती. त्याच्या कार्यकाळात त्यानं अध्यासनाच्या वतीनं अनेक उपक्रम राबवले. काही हितशत्रूंनी त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मराठी विभागाच्या सहकार्यानं त्यानं कार्यक्रम आयोजित केले. मराठी विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक त्याला आत्मीयतेनं मदत करीत.
ऐन उमेदीच्या वयात रामनाथला पोटापाण्यासाठी पायपीट करावी लागली. पुणे शहरात आल्यावर स्थिरावण्यासाठी छोटी-मोठी कामं करावी लागली. अनिश्चिततेचे चटके खावे लागले. या संघर्षाच्या काळाचा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्वावर झाला होता. पैसे कमावण्यासाठी यातायात करावी लागल्यामुळे त्याचा स्वभाव काटकसरी झाला होता. रामनाथनं एखाद्या गोष्टीसाठी मनःपूर्वक पैसे खर्च केले आहेत, असं कधी दिसलं नाही. निगुतीनं गरजेपुरता तो पैसे खर्च करीत असे. पण या संघर्षामुळेच त्याला जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी लाभली होती. भटके, विमुक्त, अनाथ, कष्टकरी यांच्याबाबत त्याच्या मनात करुणा होती. फुले- आंबेडकरांच्या परिवर्तनाच्या विचारांशी बांधिलकी मानून तो लेखन करत होता. माणसाचं माणूसपण त्याला श्रेष्ठ वाटत होतं. नव्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ तो आवर्जून आयोजित करीत असे. मान्यवरांसह मित्रांच्या गोतावळ्यात रमत असे. सगळ्यांशी सलोख्याचे संबंध राहावेत, यासाठी त्याच्या बाजूने पुढाकार घेत असे. फुले-आंबेडकरांचा अनुयायी असल्यामुळे तो कधी कर्मकांड करीत नसे. उपास-तापास, मुहूर्त, पूजापाठ हे त्याच्या खिजगणतीत नव्हतं. त्यामुळंच त्यानं ऐन अमावास्येच्या दिवशी दुपारी बारा वाजता स्वतःचं लग्न केलं होतं. त्यामुळे त्याच्याशी माझे सूर चांगले जुळत असत.
रामनाथनं आणि मी वेगवेगळ्या निमित्तानं एकत्र प्रवास केला. व्याख्यानं असो वा निरनिराळी साहित्य संमेलनं; आम्ही दोघं मिळून प्रवास करायचो. कधी रेल्वेनं, तर कधी कारने. रामनाथ प्रवासात माझ्यासोबत आनंदी असे. लेखक म्हणून त्याची महाराष्ट्रात ओळख होती, पण प्रत्यक्ष जनसंपर्क बेताचा होता. उलट मी विद्यापीठीय व्यवस्थेमध्ये असल्यामुळे असेल कदाचित- महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी मला मित्र भेटत असत. त्यामुळे खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माणच होत नसे. सांगली, नागपूर, इचलकरंजी, मूर्तिजापूर अशा अनेक ठिकाणी आम्ही एकत्र प्रवास केला. प्रवासात माणसं कळतात, अशी माझी धारणा आहे. रामनाथही प्रवासात मला अधिक कळत गेला किंवा उलट मी त्याला अधिक कळत गेलो असणार. इथे सांगायला हरकत नाही; पण रामनाथसोबतच्या अनेक प्रवासांपैकी नागपूरचा प्रवास माझ्या स्मरणात राहिला आहे. नागपूरला अस्मितादर्श रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते आणि या संमेलनाचे अध्यक्ष अस्मितादर्शचे संपादक दस्तुरखुद्द डॉ. गंगाधर पानतावणे होते. रात्री पुण्याहून मी आणि रामनाथ महाराष्ट्र एक्स्प्रेसने निघालो. सोबत आम्ही जेवण घेतले होते. रिझर्व्हेशन होते. आम्ही जेवलो आणि झोपलो. दुपारी कुठं जेवण घ्यायचं, असं रामनाथनं मला एक-दोनदा विचारलं. पण मी त्याला तपशील न सांगता म्हटलं, अकोल्यात आपली व्यवस्था झाली आहे. अकोल्यात गाडी प्लॅटफॉर्मला लागली आणि माझा मेव्हणा गाडीत चढला आणि त्यानं डबा माझ्याकडे सुपूर्त केला. बोंबिलाची चटणी, चपाती आणि खिचडी पाहून आम्ही सुखावलो, भरपेट जेवलो. रामनाथ म्हणाला, जाताना काय व्यवस्था? मी म्हटलं, योग्य वेळी ठरवू. परतताना कविमित्र शशिकांत हिंगोणेकर यांना फोन केला. त्या वेळी ते भुसावळला ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर होते. ते स्वतः डबा घेऊन आले होते. हिंगोणेकरवहिनींनी मेथीची भाजी आणि पिठलं पाठवलं होतं. माझ्या व्यवस्थापनावर रामनाथ खूश झाला होता, हे वेगळं सांगायला नको.
एका वर्षी पंधरा ऑगस्टची सुटी असल्यामुळे रामनाथ मला घरी भेटायला आला. ‘भटक्या-विमुक्तांची जातपंचायत’ हे त्याचं पुस्तक नव्यानंच बाजारात आलं होतं. त्याची प्रत भेट देण्यासाठी आला होता. मी पुस्तक चाळले. त्यात अनेक भटक्या-विमुक्तांच्या जातपंचायतींची माहिती त्यानं दिली होती. मी चर्चा करताना सहज त्याला विचारलं, ‘‘अशा किती भटक्या-विमुक्त जमाती आहेत?’’ तो म्हणाला, ‘‘किमान पन्नास साठ तरी असतील.’’ मी तत्काळ सुचवलं, ‘‘रामनाथ, या सगळ्या जमातींवर तू लिही. हे ऐतिहासिक स्वरूपाचं काम आहे. खंडात्मक स्वरूपात प्रकाशित कर. तू हे लिहिलं नाहीस तर मला वाटत नाही की, या स्वरूपाचं काम अन्य कोणी करू शकेल. भटक्या-विमुक्तांच्या चळवळीत तू वावरतो आहेस. त्या जमातीतील कार्यकर्त्यांशी तुझी ओळख आहे आणि त्या समाजातील लेखकांसोबत तुझी उठबस आहे. ते तुला तर नक्कीच मदत करतील. त्यांच्या सहकार्यामुळे एक चांगला प्रकल्प पूर्ण होईल.’’ नंतर यावर बराच वेळ आम्ही चर्चा केली. या कामाचं महत्त्व रामनाथच्याही लक्षात आलं. आजपासूनच कामाला सुरुवात करतो, असं सांगून त्यानं निरोप घेतला. त्याच दिवशी संध्याकाळी आठ वाजता त्याचा फोन आला. म्हटला, ‘‘मनोहर, दुसऱ्या खंडातील पहिला लेख लिहून पूर्ण झाला. थँक्यू.’’ रामनाथनं पुढं या विषयावर पाच खंड प्रकाशित केले. या पुस्तकातील ऐवज समाजशास्त्रीय स्वरूपाचा असला तरी मानवशास्त्र, इतिहास, साहित्य अशा अनेक विद्याशाखांतील अभ्यासकांना त्याचा संदर्भ म्हणून आज उपयोग होतो आहे. या विद्याशाखांतील संशोधकांना रामनाथच्या या कामामुळं आयती माहिती उपलब्ध झाली आहे. अनेक संशोधक त्याचा वापर करून संशोधनाच्या क्षेत्रात प्रकल्प सादर करीत आहेत. विशेषतः विद्यापीठीय पातळीवरील विद्यार्थी आपल्या संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात या माहितीचा उपयोग करताना दिसतात.
रामनाथला रुग्णालयात दाखल केल्यावर आम्ही मित्रमंडळी भेटायला गेलो होतो. पण अतिदक्षता विभागात असल्यामुळं त्याला भेटता आलं नाही. रुग्णालयातून घरी गेल्यावर त्याची प्रकृती सुधारत होती. त्याचा आत्मविश्वासही बळावला होता. सवयीप्रमाणे तो पहाटे फिरायलाही जात होता. याच काळात त्यानं ‘गावगाडा : काल आणि आज’ हे पुस्तक पूर्ण केलं होतं. या कामासाठी त्याचा मुलगा समीर धावपळ करीत होता. त्याच्या शिरस्त्याप्रमाणं त्यानं माझ्याकडे प्रुफं पाठवली होती. ती वाचून आम्ही फोनवर चर्चा केली. पुस्तक बाजारात आलं होतं. रामनाथ फोनवर संपर्कात होता... आणि अचानक तो गेल्याची धक्कादायक बातमी आली. बातमीनं आम्ही मित्रमंडळी गांगरून गेलो. शेवटी प्रत्यक्ष त्याची भेट झाली नाही ती नाहीच. मनाला चटका लागला.
Tags: भटक्या विमुक्तांचे अंतरंग रामनाथ चव्हाण लेखन पुस्तक प्रकाशन समारंभ फुले-आंबेडकर मनोहर जाधव Bhatkya Vimuktanche Antarang Ramnath Chavhan Writeup Writer Book Publishing Ceremony Aambedkar Phule Mnohar Jadhav weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या