आम्ही बाहेर पडलो. हॉटेलवर आलो. मी विचार करत होतो की, शरद पवारांचं भाषण झाल्यानंतर अध्यक्षाचं दहा मिनिटांचं भाषण ऐकण्यासाठी लोक कळ काढू शकले नाहीत. लोकांचा आपसात बोलण्याचा व खुर्च्यांचा आवाज, बाहेर पडण्यासाठी चाललेला गोंधळ आणि त्या अवस्थेत अध्यक्ष बोलताहेत. रसाळांच्या संयमाचं मला कौतुक वाटलं. अनेकांना वाटलं असणार. पण असंस्कृत लोकांची, औचित्यभंग करणाऱ्यांची मला मनस्वी चीड आली.
गोष्ट १९९५-९६ची आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला त्या वेळचे भाजपचे लोकप्रिय नेते आणि शिवसेना-भाजप युती सरकारमधील उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर हेदेखील प्रमुख पाहुणे या नात्याने स्टेजवर हजर होते. कार्यक्रमाचे स्वरूप नेमके काय होते, हे आता आठवत नाही; पण सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी सभागृह ओसंडून वाहत होते. अनेकांना जागा मिळाली नव्हती म्हणून ते सभागृहातील भिंतीजवळ दाटीवाटीनं उभे होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांचं स्वागत-बिगत झाल्यावर तळवलकर बोलतील, अशी घोषणा झाली आणि ते बोलायला उभे राहिले. तळवलकर या कार्यक्रमाला येणार आहेत; त्यांना पाहता येईल, त्यांचे भाषण ऐकता येईल एवढ्या एकाच कारणासाठी मी कार्यक्रमाला गेलो होतो. जरा लवकर गेल्यामुळं मला जागाही मिळाली होती. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव या तालुक्याच्या गावी इयत्ता सहावीत असताना मी रेल्वेच्या सार्वजनिक वाचनालयात जाऊ लागलो होतो. वडील वाचनालयाचे सभासद आणि पदाधिकारी असल्यामुळे मला आठवड्याला एक पुस्तक वाचायला मिळत असे. त्या काळी आम्ही बाबा कदम, सुहास शिरवळकर, एस. एम. काशीकर, बाबूराव अर्नाळकर, गुलशन नंदा, रानू, ओम प्रकाश शर्मा, जेम्स हेडली चेस यांची पुस्तकं मिळवून एका दिवसात त्या पुस्तकाचा फडशा पाडीत असू. सोबत समवयीन मित्रही असत. त्यांचेही वडील वाचनालयाचे सभासद असल्यामुळे त्यांनाही पुस्तके मिळत. मग आम्ही आपसात पुस्तकांची अदलाबदल करीत पुस्तके आठवडाभर वाचत असू. दर आठवड्याला हा नित्यक्रम चालायचा. वाचनालयात इंग्रजी, मराठी आणि एखाद दुसरे हिंदी वर्तमानपत्र येत असे. मी वर्तमानपत्रही वाचतो, हे वडिलांना कळल्यावर त्यांनी मला सांगितले की, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आवर्जून वाचत जा. बातम्यांसोबत ‘धावते जग’ हे स्फुट आणि अग्रलेख वाचले पाहिजेत, असंही त्यांनी मला सांगितलं होतं. बातम्या वाचण्यात मी रमत असे, पण धावते जग किंवा अग्रलेख वाचताना माझी दमछाक होई. पण पुढे कॉलेजला गेल्यावर मी महाराष्ट्र टाइम्स नियमित वाचू लागलो; तेव्हा माझे वडील मला महाराष्ट्र टाइम्स वाचायला का सांगत होते; ते समजले.
अनेक वर्षे मी महाराष्ट्र टाइम्स सातत्यानं वाचत असल्यामुळे या वर्तानपत्राचे संपादक साक्षात गोविंद तळवलकर आपल्याला पाहता-ऐकता येतील, या उत्सुकतेपोटी मी बालगंधर्व रंगमंदिरातल्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. गोविंद तळवलकरांनी भाषणाला सुरुवात केली. सभागृह शांत होते. तळवलकर काय बोलताहेत, हे ऐकत होते. दहापंधरा मिनिटं झाली आणि सभागृहात चुळबूळ सुरू झाली. तळवलकर नेमके कोणत्या विषयावर बोलत होते, ते आता आठवत नाही; पण संसदीय लोकशाही वगैरे विषय त्यांच्या बोलण्यात येत होते, असे आठवते. तळवलकरांकडे वक्तृत्व नसल्यामुळे महत्त्वाच्या विषयावर ते बोलत असूनही श्रोत्यांवर त्यांच्या वक्तृत्वाने पकड न घेतल्यामुळे चुळबूळ मोठ्या प्रमाणात वाढली. सभागृह अस्वस्थ झाले आणि चुळबुळी बरोबरच कुजबूजही वाढली मग म्हणता-म्हणता सभागृहातील लोकांचा संयम सुटला. चार-दोन टाळ्या वाजल्या आणि नंतर क्षणातच सभागृहातील लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.
तळवलकर काय समजायचे ते समजून चुकले. त्यांनी भाषण थांबवलं आणि श्रोत्यांना उद्देशून ते म्हणाले, ‘‘तुमच्या टाळ्यांचा अर्थ मला समजला. मी लोकशाही मानणारा माणूस आहे. मी माझे भाषण थांबवतो. धन्यवाद.’’ आणि ते जागेवर बसले. लोकांनी आनंदानं टाळ्यांचा कडकडाट केला. गोपीनाथ मुंडे बोलतील, अशी लगेचच घोषणा झाली आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. मुंडे बोलायला उभे राहिले. पाचच मिनिटांत मुंडेंनी सभागृहावर पकड घेतली. ते हशा आणि टाळ्या घेऊ लागले. भाषणात जोश होता. सैरावैरा फटकेबाजी होती. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नेते जसे टाळ्याखाऊ भाषण करतात तसे ते भाषण होते. या भाषणासाठी मी आलो नव्हतो. मी तत्काळ माझी जागा सोडली आणि सभागृहाबाहेर आलो. तळवलकरांचं भाषण आपल्याला ऐकायला मिळालं नाही, याचा मनात विषाद होता. मुळात या कार्यक्रमाला राजकीय पक्षांचे कार्यकर्ते श्रोते म्हणून उपस्थित होते आणि ते तळवलकरांसाठी आले नव्हते, त्यांच्या नेत्यासाठी आले होते. मग माझ्यासारखे किती लोक असतील, की जे फक्त तळवलकरांसाठी आले असतील? बहुधा संख्येनं कमी असावेत, पण असावेत. मला प्रश्न पडला की, तळवलकर अशा कार्यक्रमासाठी का म्हणून आले असतील? अशा कार्यक्रमाला जाण्याबद्दल त्यांची ख्याती नव्हती. उलट ते सार्वजनिक कार्यक्रमात व्याख्यानासाठी जात नसत, असंच ऐकून होतो. आता अलीकडे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी जे स्मृतिलेख लिहिले, त्यातील काही लेखांमध्ये याची नोंद आहे. कारण काहीही असो; पण तळवलकर भाषणासाठी आले होते, पण लोकांनी म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करून त्यांचे भाषण पाडले. याचा अर्थ हे कार्यकर्ते सांस्कृतिक वकूब नसलेले थिल्लर पातळीवरचे होते. सांस्कृतिक वकूब नसू द्या (खरं तर तो सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या कार्यकर्त्यांजवळ असणं गरजेचं आहे.); पण आपण एका मोठ्या संपादकाचा आपल्या कृतीतून अपमान करीत आहोत, याचीही जाणीव कोणाजवळ दिसली नाही. दिसला तो मस्तवालपणा. बेमुवर्तखोरपणा. आणखी एक प्रश्न मनात सलत राहिला. तो म्हणजे, कार्यकर्ते हडेलहप्पी करीत असताना नेत्याने तरी सभागृहाला समज द्यायची. आपण औचित्यभंग करतोय आणि हे अशोभनीय वर्तन आहे, समाजात यामुळे आपल्यासंबंधी चुकीचा संदेश जाईल- असं तरी बजवायचं. पण कसंचं काय! नेतेच भाषण करायला इतके उत्सुक होते की, त्यांनी घडलेल्या घटनेची दखल न घेता स्वतःच्या भाषणाला सुरुवात केली. ना नेत्याजवळ आचपेच, ना कार्यकर्त्यांजवळ. आपली राजकीय संस्कृती किती एकारलेली आहे, हे दर्शवणारी ही घटना.
याच घटनेची आठवण व्हावी अशी एक घटना अलीकडे घडली. वरील घटनेत तळवलकरांचं भाषण ज्या पद्धतीनं पाडण्यात आलं, तसं घडलं नाही; पण जे घडलं ते बरं नव्हतं, बेचैन करणारं होतं. हकिगत अशी, औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषद दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करीत असते. त्यातला एक उपक्रम म्हणजे विशिष्ट विषयांतर्गत येणाऱ्या उल्लेखनीय साहित्यकृतींना पुरस्कार देऊन गौरवणे. त्यासाठी ही परिषद वाङ्मयक्षेत्रातील जाणकारांची समिती नेते. या वर्षी राजकीय आशय असणाऱ्या साहित्यकृतीला आणि मराठी रंगभूीवर वैशिष्ट्यपूर्ण योगदान दिलेल्या रंगकर्मीला पुरस्कार देऊन सन्मानित करायचं, असं परिषदेनं ठरवलं. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि कार्यकारिणी समितीनं या कामासाठी ज्येष्ठ लेखक नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेली. समितीचे सदस्य म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माझे सहकारी प्रभाकर देसाई आणि माझी नियुक्ती करण्यात आली. परिषदेचं तसं रीतसर पत्र आम्हाला आलं आणि आम्ही काम सुरू केलं. समितीची बैठक झाली आणि दोन नावं एकमतानं निश्चित झाली. राजकीय आशयाची साहित्यकृती म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ हे आत्मचरित्र व रंगभूमीवरील योग-दानासाठी जब्बार पटेल या दोन नावांची शिफारस समितीनं केली आणि कोत्तापल्ले यांनी समितीचे अध्यक्ष या नात्याने परिषदेकडं अहवाल पाठवून दिला. पुरस्कार वितरणाची तारीख निश्चित झाली. शरद पवार आणि जब्बार पटेल या दोन मान्यवरांनी पुरस्कार स्वीकारण्यास संमती दिली आणि पुरस्कार वितरणाची तारीख निश्चित झाली.
ठालेपाटील यांचे समितीला तसे पत्र आले. फोनही आला. त्यांनी समितीला कार्यक्रमास येण्याचे निमंत्रण तर दिलेच, पण समितीवर एक जबाबदारीही टाकली. जबाबदारी अशी की, परीक्षक समितीचे अध्यक्ष या नात्याने कोत्तापल्ले यांनी समितीची भूमिका विशद करावी आणि मी ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचे विवेचन करावे. जब्बार पटेल यांच्यावर औरंगाबादचे स्थानिक रंगकर्मी दिलीप घारे बोलणार होते. प्रत्येकाला फक्त दहा मिनिटांचा वेळ होता. तेवढ्या वेळात त्यांनी बोलायचं होतं. पुरस्कारार्थी मान्यवरांना बोलायला जास्त वेळ मिळावा, ही त्यामागची योजना होती.
दि. २३ एप्रिल २०१७ रोजी परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सायंकाळी ६.४० वाजता कार्यक्रम सुरू झाला. समारंभाचे अध्यक्ष मराठीतील ख्यातनाम समीक्षक सुधीर रसाळ हे होते. पुरस्कारही त्यांच्याच हस्ते प्रदान करायचे होते. ठाले-पाटलांचं प्रास्ताविक झाल्यानंतर स्टेजवरील सगळ्या मान्यवरांचं स्वागत झालं. दादा गोरे सूत्रसंचालन करीत होते. कोत्तापल्ले यांनी भूमिका मांडली. आपलं बोलणं तंतोतंत वेळेत व्हावं, म्हणून मी लिहून आणलेलं माझं मनोगत ८ ते १० मिनिटांत वाचून दाखवलं. जब्बार पटेल विस्तारपूर्वक बोलले. शरद पवारांनी आपल्या भाषणात त्यांच्या राजकीय जीवनातील किस्से सांगून धमाल उडवून दिली. शरद पवारांमुळे सभागृह तुडुंब भरले होते. बसायला जागा नव्हती. ज्यांना जागा मिळाली नाही, ते दाटीवाटीनं उभे होते. अर्थातच त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि इतर पक्षांचे कार्यकर्ते असणार. औरंगाबादच्या साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांची हजेरी होती. मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागांतूनही लोक आले होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कवी ना. धों. महानोर स्टेजवर होते. श्रोत्यांत न्या. नरेंद्र चपळगावकर, फ. मुं. शिंदे, रा. रं. बोराडे, आसाराम लोमटे आदी मंडळी होती. पण जास्त भरणा होता कार्यकर्त्यांचाच. ते आपल्या नेत्याचं भाषण ऐकायला आले होते. शरद पवार भाषण संपवून खाली बसत नाही तोवर सभागृहातील लोकांनी आपली जागा सोडली आणि ते लगबगीनं बाहेर पडू लागले. बाहरे पडतानाचा गडबड-गोंधळ सुरू झाला. त्यातच अध्यक्ष सुधीर रसाळ याचं नाव पुकारलं गेलं. ते अध्यक्षीय भाषणाला उभे राहिले पण गोंधळ कमी होईना. त्यांनी गोंधळातच बोलायला सुरूवात केली. दहा मिनिटांत सभागृह जवळजवळ रिकामं झालं. सभागृहात ५०-७५ लोक बसून होते. ते ऐकत होते. रसाळ ‘लोक माझे सांगाती’वर थोडा वेळ बोलले, पण चांगलं बोलले. आभार प्रदर्शन झालं. स्टेजवरील मान्यवर बाहेर पडताना शरद पवारांच्या भोवती गर्दी गोळा झाली.
आम्ही बाहेर पडलो. हॉटेलवर आलो. मी विचार करत होतो की, शरद पवारांचं भाषण झाल्यानंतर अध्यक्षाचं दहा मिनिटांचं भाषण ऐकण्यासाठी लोक कळ काढू शकले नाहीत. लोकांचा आपसात बोलण्याचा व खुर्च्यांचा आवाज, बाहेर पडण्यासाठी चाललेला गोंधळ आणि त्या अवस्थेत अध्यक्ष बोलताहेत. रसाळांच्या संयमाचं मला कौतुक वाटलं. अनेकांना वाटलं असणार. पण असंस्कृत लोकांची, औचित्यभंग करणाऱ्यांची मला मनस्वी चीड आली. बुद्धिवादी- सुसंस्कृत म्हणवणारी, जबाबदारीनं वागण्याची ज्यांच्याकडून अपेक्षा आहे, अशी मंडळी जेव्हा सार्वजनिक ठिकाणी संकेतभंग करतात; तेव्हा आपण खरोखर कुठे उभे आहोत, हे जाणवून शरमेनं मान खाली जाते. घटना दोन, पण मानसिकता एक सारखीच. दोन्ही घटनांध्ये २०-२१ वर्षांचं अंतर. दोन्ही घटना वेगवेगळ्या शहरांतल्या. एक शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवतं, तर दुसरं मराठवाड्यातील चळवळीचं केंद्र. आपल्या समाजात संपादक, विचारवंत, साहित्यिक-समीक्षक, कलावंत यांच्याकडे आपण कसं पाहतो, हे दर्शवणाऱ्या या दोन घटना. भौतिक विकास कितीही होऊ द्या, सांस्कृतिक विकासाशिवाय सर्वंकष विकासाच्या शक्यता कमी हे सुचवणाऱ्या या दोन घटना. अजून आपल्याला बरीच मजल मारायची आहे, हे सांगणाऱ्या या दोन घटना. अशा लाजिरवाण्या घटना पुनःपुन्हा घडू नयेत यासाठी काय करता येऊ शकेल? असा विचार मी करीत होतो. (जे तळवलकर, रसाळ यांच्याबद्दल घडलं तसं जयंत नारळीकर, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर, रामचंद्र गुहा यांसारख्या मान्यवरांसोबत घडणारच नाही, याची खात्री देता येत नाही.) राजकीय कार्यकर्त्यांना या घटना आपल्यासाठी, पक्षासाठी, आपल्या नेत्यांसाठी लाजिरवाण्या आहेत- याची तरी जाणीव असेल का? मला शंका आहे. राजकीय पक्षात अनेक विंग्ज (म्हणजे शाखा) असतात. उदा.- विद्यार्थी, कामगार, शिक्षक यांना एकत्र करून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांच्यातीलच पदाधिकारी नेमून या शाखा बांधल्या जातात आणि त्या त्या गटासाठी त्या कार्यरत असतात. माझा असा समज आहे.(कदाचित तो खरा असावा.) की, नेते आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधणारी काही मंडळी किंवा यंत्रणा असणार. म्हणजे आपले नेते अमुक एका कार्यक्रमासाठी शहरात येत असल्यामुळे त्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ही यंत्रणा कार्यान्वित होत असणार. या यंत्रणेने कार्यक्रमाचे स्वरूप, त्याचे गांभीर्य उपस्थित राहू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात ठसवावे. म्हणजे असे की, आपल्या नेत्यासोबत अमुक एक मान्यवर स्टेजवर असणार आहेत. आपल्या नेत्यांसोबत ते असल्यामुळे आपल्या नेत्यांइतकेच ते आदरणीय आहेत. भलेही आपल्याला त्या व्यक्तीचे कार्यक्षेत्र, त्यातील त्यांचे स्थान माहीत नसेल; पण या व्यक्ती आपल्या नेत्यांसोबत स्टेजवर बसणार आहेत, भाषण करणार आहेत किंवा आपल्या नेत्याचा त्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे- याचाच अर्थ ती व्यक्ती आपल्याला अनोळखी असली तरी तोलामोलाचीच असणार आहे. त्यामुळे त्यांचा चुकूनही अवमान होईल असे वर्तन आपल्याकडून होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी, असा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. जमलंच तर त्या व्यक्तीचा संक्षिप्त परिचय समाजमाध्यमामार्फत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून, औचित्य-भंग होणार नाही याची दक्षता घ्यायला सांगून कार्यक्रम ‘पार पाडता’ येईल. यामधूनच कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होत राहील आणि कदाचित अशी खबरदारी पुढे घ्यावी लागणार नाही. क्रमाक्रमानं कार्यकर्ते प्रशिक्षित होतील. मुख्य म्हणजे, शहाणे होतील आणि मग त्यांची, पक्षाची, नेत्यांची ‘शोभा’ होणार नाही. कुणाला हा भाबडा आशावाद वाटेल, पण तो व्यक्त करण्यापलीकडे आपण काय करू शकतो?
Tags: संपादक महाराष्ट्र टाइम्स गोविंद तळवलकर सुधीर रसाळ शरद पवार मनोहर जाधव Editor Maharashtra Times Govind Talwalakar Sudhir Rasal Sharad Pawar Manohar Jadhav weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या